‘भगीरथ बियाणींच्या पोरीला कोणी छळलं?’ जितेंद्र आव्हाड यांचा बीडमधील बड्या नेत्यावर गंभीर आरोप
"माझं नाव न घेता जे बोलले, काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? राजकीय जन्म काकानेच दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती. मग त्या चुलत बहीणीच्या घरी जावून आता तू मला ओवाळ? असं कशाला करता? भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या पोरीला कोणी छळलं?", असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी केले.
!['भगीरथ बियाणींच्या पोरीला कोणी छळलं?' जितेंद्र आव्हाड यांचा बीडमधील बड्या नेत्यावर गंभीर आरोप 'भगीरथ बियाणींच्या पोरीला कोणी छळलं?' जितेंद्र आव्हाड यांचा बीडमधील बड्या नेत्यावर गंभीर आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/jitendra-awhad.jpg?w=1280)
मुंबई | 1 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी बीडमधील एका बड्या नेत्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. “आमच्यावर अजित पवार गटाचे काही नेते टीका करत आहेत, जे स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसून आले आहेत. सख्या चुलत बहीणीचे हालहाल केले, भाजपचे जिल्हाध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी कुणामुळे आत्महत्या केली? आताच बीडमध्ये एकाची हत्या झाली. याप्रकरणी एक साधी केस घेतली नाही”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“बीड जिल्ह्यात 2022 पासून जी खूनांची मालिका सुरु झाली, त्यामागे कोण आहे? अहो बोलता तर आम्हालाही येतं. तुम्हालाच बोलता येतं असं नाहीय. मी कुणाचं ऐकायला जन्माला आलेलो नाहीय. मी कुणाच्या नांदाला लागत नाही. आपल्या नांदाला कुणी लागू नये”, असा मोठा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
‘भगीरथ बियाणी यांच्या पोरीला कुणी छळले?’
“माझं नाव न घेता जे बोलले, काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? राजकीय जन्म काकानेच दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती. मग त्या चुलत बहीणीच्या घरी जावून आता तू मला ओवाळ? असं कशाला करता? भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या पोरीला कोणी छळलं आणि त्या छळाला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही?”, असे धक्कादायक प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले.
“परळीत आता मुंडे नावाचा पोरगा मारला गेला. पोलिसांमुळे मारला गेला किंवा काहीतरी झालं, गुन्हा का नोंदवला गेला नाही? मी कधीच काही बोलत नाही. मी आजपर्यंत तोंडातून कुणाचंही नाव काढलेलं नाही. पण तुम्ही माझं नाव काढलं तर मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही”, असा अशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
‘भाजपसोबत चला असं कोण सांगायचं ते मला माहिती’
यावेळी त्यांनी अजित पवार गटावरही टीका केली. “तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं हे स्वत:च्या मनाला विचारा. शरद पवारांचं सतत पाच वर्षे कोणी डोकं खाललं हे परमेश्वाराला स्मरुन महाराष्ट्राला सांगा. कोण कोण माणसं आहेत जे शरद पवारांना सांगायचे की, चला भाजपसोबत चला हे स्मरुन सांगा. उद्विग्न अवस्थेत आलेला माणूस काय करतो?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला.
“तो असे पटकन निर्णय घेतो. मला हे माहिती नाही की काय घडलं, पण त्यांच्याकडे कोण जायचं ते मला माहिती आहे. उठले की भाजपसोबत जाऊया म्हणायचे. 2014 पर्यंत कुणी बोलले नाही कारण सत्तेत होते. शरद पवारांचा चेहरा धुळीत मिळवायचं आणि आपण सत्तेत राहायचं असा विचार होता. पण तो विचार आम्हाला नामंजूर होता”, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.
“बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. तुम्ही हे जर सांगत असाल की, शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्या आम्ही हळूहळू काढणार, तर खुशाल काढा. हे असली आव्हानात्मक भाषा वापरु नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितलं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.