Mumbai Rains: मुंबईकरांनो पुढचे काही तास पावसाची जोरदार बॅटिंग! RMC Mumbaiची माहिती, ठाणे, रायगड, पालघरचाही समावेश

| Updated on: Jul 07, 2022 | 6:41 AM

Mumbai Rains: पुढील 3-4 तासात मुंबई ठाणे रायगड आणि पालघरच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागातही मध्यम ते तीव्र पावसाच्या सरी बरसणार आहेत.

Mumbai Rains: मुंबईकरांनो पुढचे काही तास पावसाची जोरदार बॅटिंग! RMC Mumbaiची माहिती, ठाणे, रायगड, पालघरचाही समावेश
मुंबईकरांनो पुढचे काही तास पावसाची जोरदार बॅटिंग!
Follow us on

मुंबई: महिना झाला राज्यात मान्सूनचं (Maharshtra Monsoon) आगमन झालंय. सोमवारपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय. मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावलीये. काल रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. RMC Mumbai ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासात मुंबई ठाणे रायगड आणि पालघरच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागातही मध्यम ते तीव्र पावसाच्या सरी बरसणार आहेत.

उर्वरित राज्यातही पावसाची हजेरी

हवामान खात्यानं पावसाबाबत अचूक अंदाज वर्तविल्याचं दिसून येतंय. जुलै महिन्यात हवामान विभागाने मुंबईच नाहीतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबईसह उपनगरात आणि कोकणात कोसळधारा झाल्या आहेत. उर्वरित राज्यातही पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईसह उपनगरात पावसामध्ये सातत्य कोकण आणि मुंबईमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी ही राहिलेली आहे. आतापर्यंत या विभागात पावसाचे सातत्य राहिले आहे तर सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वसई विरारमध्ये अनेक भागात पाणी

मुंबई उपनगरात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वांद्र्यासह काही भागात अद्यापही पाणी साचले आहे. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसामुळे परिसरास तलावाचे स्वरूप आले असून रस्ते जलमय झाले आहेत. वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर कायम असून वसई विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. विरारच्या विवा कॉलेज परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पनवेल परिसरातसुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून या सगळ्याच भागात जोराचा पाऊस आहे.

महाराष्ट्रात इतर भागात पाऊस

  1. कोल्हापूर- कोल्हापूरातही जोर, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ. आतापर्यंत कोल्हापूरलाही पावसाने वगळले होते. पण सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर गेली असून राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
  2. नांदेड- नांदेडमध्येही सर्वदूर पाऊस नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय.सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर पेरणी राहिलेले शेतकरी आता लगबग करताना दिसणार आहेत.
  3. बुलढाणा- पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे. पेरणीनंतर पावसाने उघड दिली होती तर काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. पण आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे.