BIG BREAKING | घडामोडी वाढल्या, महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलावली

| Updated on: May 13, 2023 | 7:39 PM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे नुकतंच महाराष्ट्राच्या सत्तांसघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल जाहीर झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आगामी काळासाठी काय रणनीती आखली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BIG BREAKING | घडामोडी वाढल्या, महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलावली
maha vikas aghadi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला बघायला मिळतोय. तर काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलीय. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात हालचाली वाढल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीची उद्या तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांमधील मतभेद समोर आले. पण आता हे सर्व मतभेद बाजूला सारुन महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकजुटीने पुढे जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील निकालामुळे महाविकास आघाडीला उभारी आल्याचं चित्र आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत मविआची बैठक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे इतर देखील महत्त्वाचे नेते असतील, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुासर काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला अवघ्या 64 जागांवर समाधान मानावं लागताना दिसत आहे. दुसरीकडे जेडीएसला 19 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इतर 4 ठिकाणी अपक्ष आमदार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी भाजपला झटका देणारी आहे. कारण भाजपच्या हातून आता कर्नाटकातील सत्ता निसटण्याची चिन्हं आहेत. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत.

संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

दरम्यान, कर्नाटकातील निकाल समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीची दहशत दाखवण्यात आली. शिवकुमार यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं होतं. या सगळ्यांना न जुमानता कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे हुकूमशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

या निकालावर राज्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारलं असता फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. “देवेंद्र फडणवीस यांचा गोंधळ मी समजू शकतो. ते ज्यांच्या संगतीला आहेत त्यांना राजकारण काही कळत नाही. ढेकणं संगे हिरा भंगला असं म्हणतात. तसा हा हिरा ढेकण्याच्या नादाला लागून भंगलाय”, असा टोला राऊतांनी लगावला.