संजय राऊत कोल्हापुरात, पण एका वक्तव्याने मुंबईत वादळ, आता शिंदे गटाने काय केली मागणी

संजय राऊत यांच्या विधानाचे पडसाद विधानसभेत आणि विधान परिषदेत उमटले. यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.

संजय राऊत कोल्हापुरात, पण एका वक्तव्याने मुंबईत वादळ, आता शिंदे गटाने काय केली मागणी
Image Credit source: social media
Jitendra Zavar | Updated on: Mar 01, 2023 | 1:31 PM

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोल्हापुरात आहेत. परंतु त्या ठिकाणी केलेल्या एका वक्तव्याने मुंबईत वादळ निर्माण झाले आहे. त्या विधानावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.  हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान संजय राऊत केले अन् विधानसभा, विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. या विधानानंतर सत्ताधारी आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसची साथ मिळाली. आता संजय राऊत यांच्या विधानाची दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी आक्रमक होते. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. अखेर सभागृह उद्यापर्यंत तहकूब करावे लागले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी सांगितले की, संजय राऊत यांना आताच अटक झाली पाहिजे. आम्ही चोर आहोत, म्हणणे माझे आमच्यावर लागलेला डाग आहे. जोपर्यंत हा डाग निघत नाही, आम्ही आक्रमक राहू. त्यासाठी आधी संजय राऊत यांना अटक झाली पाहिजे. संजय राऊत जर खरे शिवसैनिक असतील तर त्यांनी १० मिनिटे सुरक्षा सोडावी, मग आम्ही त्यांना दाखवून देऊ. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संजय राऊत काय म्हणाले?


संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ.  हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो.

विधानसभा, विधान परिषदेत पडसाद


संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत आणि विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांना राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली. विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊत यांच्याकडून विधिमंडळाचा अपमान होत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी घेतली. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन कारवाईच्या मागणीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही पाठिंबा दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us