Maharashtra Cabinet Expansion : औरंगाबादला तीन कॅबिनेट मंत्रीपदं, तर तीन मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे 5 मोठे मुद्दे

शिंदे फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात भाजपातर्फे औरंगाबादमधील अतुल सावे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

Maharashtra Cabinet Expansion : औरंगाबादला तीन कॅबिनेट मंत्रीपदं, तर तीन मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे 5 मोठे मुद्दे
खातेवाटपाची 10 वैशिष्ठ्ये
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 09, 2022 | 1:01 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आज करण्यात आला. हा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार असून यात असलेला असमतोल दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना मंत्रीपदे नसून काही जिल्ह्यांना तर तीन-तीन मंत्रीपदे आली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचाही यात समावेळ आहे, औरंगाबाद जिल्ह्याला तब्बल तीन मंत्रीपदे आली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis government) या मंत्रिमंडळात भाजपातर्फे औरंगाबादमधील अतुल सावे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे विरोधकांकडून याला विरोध होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाहू या, पाच मोठे मुद्दे…

  1. औरंगाबादमध्ये तीन मंत्री – औरंगाबादमध्ये शिवसेनेतील बंडखोर अब्दुल सत्तार त्याचप्रमाणे संदीपान भुमरे या दोघांना मंत्रीपद देण्यात आले आहे. तर भाजपाने अतुल सावे यांना मंत्रीपद दिले. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याने मूळ शिवसेनेला शह देण्यासाठी ही रणनीती आखली असल्याची चर्चा सुरू आहे.
  2. घोटाळ्याचे आरोप आणि वादग्रस्तांना संधी – औरंगाबादेतील मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अब्दुल सत्तार यांचे नाव टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. अशात त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यांच्यासह संजय राठोड हे वादग्रस्त असून त्यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपानंतर मागील सरकारमध्ये त्यांनी राजीनामाही द्यावा लागला होता. तर धरण फुटीप्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर पद गमावलेल्या तानाजी सावंत यांनाही संधी देण्यात आली आहे.
  3. मंत्रिमंडळात महिला नाही – राज्य सरकारच्या या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात एकाही महिला आमदारास स्थान देण्यात आलेले नाही. शिंदे गटातील आमदार त्याचप्रमाणे भाजपा या दोघांकडूनही महिलांना डावलण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील राज्य सरकारवर यावरून टीकास्त्र सोडले आहे.
  4. अपक्षांना डावलले – शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात आपल्याच पक्षाला प्राधान्य दिले असून सहकारी अपक्षांना पूर्णत: डावलले आहे. शिंदे गटासोबत एकूण 10 अपक्ष समर्थनासाठी पुढे आले होते. त्यातील एकाच्याही नावाचा विचार यात केला गेला नाही. त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी पसरली आहे.
  5. केंद्रातील मंत्र्यांची दांडी – आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमास भाजपाचा केंद्रातील एकही मोठा नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यालादेखील कोणताच बडा नेता उपस्थित नव्हता.