BIG BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठंं काहीतरी घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत राजभवनावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. 

BIG BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठंं काहीतरी घडतंय?
Chetan Patil | Updated on: May 04, 2023 | 9:43 PM

निखिल चव्हाण, Tv9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत राजभवनावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची ही नियोजित भेट नाही. मुख्यमंत्री अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यात एक तास बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. पण या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या भेटीचा टायमिंग जास्त महत्त्वाचा आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे घडामोडी घडत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत अचानक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीची घटना घडत आहे.

एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही खरतंर पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झालं त्यावेळी भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते. पण नंतर त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली. या दरम्यान राष्ट्रपतींकडून रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. पण नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या काही दिवसांपासून भेट झाली नव्हती. त्यामुळे राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहे. सुरुवातीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याची बातमी समोर आली. पण नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर येऊन तसं काही नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर पुन्हा अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अर्थात या चर्चा शिगेला पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी या चर्चांचं खंडन केलं.

शरद पवार यांच्या राजीनामा

या सगळ्या घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या घटना आणखी कुठपर्यंत जाणार? अशा चर्चा सुरु झाल्या. या घडामोडींचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा काही संबंध तर नाही ना? अशा चर्चांनाही उधाण आलं.

केंद्रीय कायदेमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट

या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज वेगळीच बातमी समोर आली. केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात एक बैठक झाली. अर्थात या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. पण ते खरंच शक्य आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us