Maharashtra MLC Election: आघाडी भाजपचे आमदार फोडणार?; नाना पटोले यांच्या विधानाचा अर्थ काय?

| Updated on: Jun 19, 2022 | 10:39 AM

Maharashtra MLC Election: कालच्या बैठकीत रणनीती तयार झाली. 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे. आज देखील महाविकास आघाडीची बैठक आहे.

Maharashtra MLC Election: आघाडी भाजपचे आमदार फोडणार?; नाना पटोले यांच्या विधानाचा अर्थ काय?
आघाडी भाजपचे आमदार फोडणार?; नाना पटोले यांच्या विधानाचा अर्थ काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: विधान परिषद निवडणुकीचं (Maharashtra MLC Election) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. भाजपने या निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार उतरवल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय या निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मोठं विधान केलं आहे.ज्याप्रमाणे भाजप महाविकासआघाडीच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे, त्या प्रकारे महाविकास आघाडी (maha vikas aghadi) देखील त्यांच्या आमदाराशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठीची रणनीतीही आखण्यात आली आहे, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. पटोले यांच्या विधानाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या निवडणुकीत काँग्रेसही आमदारांची फोडाफोडी करणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. कालच्या बैठकीत रणनीती तयार झाली. 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे. आज देखील महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा पुन्हा रणनीती तयार केली जाईल. काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून आमदारांना फोन

भाजपचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून वेळ आली की ही माहिती उघड करू, असंही त्यांनी सांगितलं.

पवारांची गैरहजेरी

आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आजच्या बैठकीत शरद पवार नसतील. तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळेजण उपस्थित राहतील. मात्र पवार साहेबांचा मार्गदर्शन यावेळी राहणारच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तरुणांची चेष्टा सुरू आहे

अग्निपथ योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. देशाच्या सुरक्षा योजनेत नरेंद्र मोदी हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे देशातील लोक मोदींना माफ करणार नाहीत. तरुणांची चेष्टा सुरू आहे. आम्ही सांगतो तरुणांनी कायदा हातात घेऊ नये. काँग्रेसला सहयोग करा. काँग्रेस जुन्या पद्धतीचे धोरण आणून देशाला पुन्हा उभारी देण्याचं बळ देईल, असंही ते म्हणाले.