पावसामुळे मोठा फटका, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणीच पाणी, वाहतूक ठप्प!

| Updated on: Jun 30, 2023 | 6:37 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

पावसामुळे मोठा फटका, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणीच पाणी, वाहतूक ठप्प!
Follow us on

पालघर : राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका आता वाहतुकीवर देखील पडताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक जवळपास ठप्प झाल्यात जमा आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा देशातील अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गातून प्रवासी वाहतुकीसोबतच अवजड वाहतूक देखील होत असते. पण जोरदार पावसामुळे या महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक बंद सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईहून गुजरात आणि गुजरातहून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वसईतील ससू नवघर या ठिकणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. त्या डोंगराचं पाणी रस्त्यावर वाहून येतंय. पण हे पाणी समुद्राच्या दिशेला जाण्यासाठी अडथडे येत आहे. या पाण्याचा समुद्राच्या दिशेला जाण्यासाठी निचरा होत नाहीय.

स्थानिकांचा प्रशासनावर आरोप

संबंधित परिसरात रस्त्यालगत बांधकाम झालंय. नाले बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी समुद्रात जाण्यासाठी अडथळा येतोय. तर दुसरीकडे प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. नालेसफाई झालेली नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

जवळपास सात ते दहा तासांपासून अनेक वाहनं हे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. या वाहनांमध्ये अनेक लहान मुलं, रुग्ण आहेत. पण गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देईल आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी काही मार्ग काढेल का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय.

महाडमध्ये दरड कोसळली, तीन गावांचा संपर्क तुटला

दरम्यान, रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील बिरवाडी भागात दरड कोसळली आहे. त्यामुळे या भागातील रस्ता आता बंद झाला आहे. विशेष म्हणजे दरड कोसळल्यामुले तब्बल 3 गावांचा संपर्क तुटला आहे.

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे.  विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.