शिंदे-फडणवीस यांच्यात एक तास खलबतं, भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

| Updated on: Jul 07, 2023 | 12:02 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीस यांच्यात एक तास खलबतं, भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती हे राष्ट्रवादीच्या वाटेला जातील, अशी शिवसेना आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे. तसेच अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी निधी न देण्याच्या कारणास्तव महाविकास आघाडी सरकारमधून आमदार बाहेर पडले. पण आता अजित पवार यांना सत्तेत घेतलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची देखील माहिती समोर आली होती. तसेच शिवसेनेच्या गोटात सध्या प्रचंड धुसफूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे.

विशेष म्हणजे भाजपकडून आता शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. जवळपास तासभर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नंदनवन बंगल्यावर बैठक पार पडलीय.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची काल महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिवसेनेची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही गटाच्या आमदारानं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार

दोन्ही नेत्यांकडून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता होणाऱ्या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या नेत्याना सर्वाधिक स्थान मिळणार आहे.

सरकारचा मंत्रीमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, हे दोन्ही गटाच्या आमदारानं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.