संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांनाच चॅलेंज देण्याच्या तयारीत? वरळीत राजकीय उठाठेव होणार?

| Updated on: Mar 21, 2023 | 12:00 AM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीतील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेवर निशाणा साधणारे आदित्य ठाकरे यांच्यासमोर निवडणुकीच्या रणांगणात अनेक आव्हानं उभी राहण्याची शक्यता आहे.

संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांनाच चॅलेंज देण्याच्या तयारीत? वरळीत राजकीय उठाठेव होणार?
Follow us on

मुंबई : काही दिवसांपूर्वा वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलेलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून वरळीतून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. पण आता आदित्य ठाकरे यांनाच भविष्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदारकीला निवडून येण्यासाठी मनसेकडून (MNS) चॅलेंज दिलं जाऊ शकतं. आदित्य ठाकरे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आलेली. पण आगामी निवडणुकीत तसं काही होण्याची शक्यता कमी आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरेंना भाजप-शिवसेनेचं कडवं आव्हान असणार आहेच, याशिवाय मनसेचं देखील कडवं आव्हान राहण्याची शक्यता आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

“वरळी मतदारसंघ हा दादर मतदारसंघाच्या अगदी लागून असलेला मतदारसंघ आहे. चार-पाच दिवसांपूर्वी वरळीच्या बीडीडी चाळीत राहणारे नागरीक तिथल्या काही समस्या घेऊन राज ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर मी त्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या नेमक्या आहेत, काय सोल्यूशन्स निघू शकतात, हे सगळं जाणून घेण्याचा आदेश राज ठाकरेंनी मला दिला. त्यादिवशी मी होतो, योगेश परुळेकर होते, बाळा नांदगावकर सुद्धा येणार होते. पण दुर्देवाने त्यांचं काही काम निघालं पण ते आले नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून बैठक घेतली”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

“मी राज ठाकरे यांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे. ते मला जो आदेश देतील त्याप्रमाणे मी वागेन. ते म्हणाले, निवडणूक लढ, तर निवडणूर लढणार. ते म्हणाले, या जागेवरुन निवडणूक लढ, मी त्या जागेवरुन निवडणूक लढवणार. वरळी काय त्यांनी मला गडचिरोली सांगितलं तर गडचिरोली येथून मी निवडणूक लढेन. ते जो आदेश देतील तो पाळेन”, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली.