Monsoon Update : मान्सूनचा पाऊस 10 जूननंतरच मुंबईत बरसणार! मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्यानं आगमन लांबलं

| Updated on: Jun 02, 2022 | 2:03 PM

Monsoon Update Today : बुधवारी कर्नाटकमध्ये मान्सूनचे धडक दिली होती. तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या पावसाची वाटचाल मंदावली आहे.

Monsoon Update : मान्सूनचा पाऊस 10 जूननंतरच मुंबईत बरसणार! मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्यानं आगमन लांबलं
हलक्याशा पावसाची सुरुवात
Follow us on

मुंबई : केरळमध्ये मान्सून (Monsoon Rain News) तीन दिवस अगोदर दाखल झाला. मात्र मुंबईत मान्सूनचा पाऊस 10 जूननंतर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कर्नाटकात (Karnataka Monsoon) मान्सूनचा पाऊस पोहोचला आहे. मात्र अनेक भागात मान्सूनने कर्नाटक व्यापणं बाकी आहे. कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनची दमदार हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सध्या सुरु असलेली मान्सूनची वाटचाल पाहता मान्सूनचा पाऊस मुंबईत पोहोचलाय 10 जूनची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतरही मुंबईत मान्सूनच्या (Mumbai Monsoon Rain News) सरी बरसतील, असं सांगितलं जातंय. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई कधी येणार मान्सून?

येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून मुंबईत कधी धडक देणार, याची स्पष्ट तारीख जरी सध्या सांगता येत नसली, तरी 10 जून आधी मान्सून मुंबई येण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईत मान्सून कधी दाखल होणार, याबाबत अंदाज बांधणं अवैज्ञानिक ठरेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणंय.

येत्या 48 तासांत कोकण, गोव्यात

बुधवारी कर्नाटकमध्ये मान्सूनचे धडक दिली होती. तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या पावसाची वाटचाल मंदावली आहे. कर्नाटकात पोहोचलेल्या पावसाची येत्या 48 ते 72 तासांत तामिळनाडू, कोकण आणि गोव्याच्या काही भागात शक्यता आहे. मात्र मुंबईत मान्सूनच्या पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा मान्सूनचा पाऊस लवकर बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. केरळमध्ये तीन दिवस मान्सून लवकर येऊनही मान्सूनचा पाऊस मुंबईत यायला उशीर होणार असल्यानं मुंबईकर पुन्हा घामाघूम झालेत. किमान सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनासाठी करावी लागू शकते.

मान्सूननं आतापर्यंत कुठपर्यंतचा प्रवास पूर्ण केला?

मध्य अरबी समुद्राचा काही भाग कर्नाटक, केरळचा संपूर्ण भाग, तामिळनाडूचा काही प्रदेश, दक्षिण-पूर्व बंगालची संपूर्ण खाडी, दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीचा काही भाग, पूर्ण-मध्य बंगाल खाडी, पश्चिम मध्यचा काही आणि उत्तर बंग बंगाल खाडीचा जवळपास पूर्ण भाग व्यापलाय.