‘कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले?’, नारायण राणेंचा सवाल

| Updated on: May 25, 2021 | 10:07 PM

नारायण राणे यांनीही गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. तसंच कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलंय.

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले?, नारायण राणेंचा सवाल
गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाचा नारायण राणेंकडून निषेध
Follow us on

मुंबई : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’(Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) या पुस्तकावर मोठी टीका सुरु आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. तसंच कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलंय. (BJP MP Narayan Rane protests against Girish Kuber’s book)

“लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केले आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही”, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलंय.

संभाजीराजेंकडूनही पुस्तकावर बंदीची मागणी

सरकारने तात्काळ या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनीही केली आहे. ते नांदेडमध्ये मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. असे लिखाण आपण खपवून कसे घेतो? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपतींनी दिलाय.

नेमकं प्रकरण काय?

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : 

पत्रकार गिरीश कुबेरांच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर, राष्ट्रवादी, भाजप, संभाजी ब्रिगेड आक्रमक, बंदीची मागणी

BJP MP Narayan Rane protests against Girish Kuber’s book