MUMBAI HISTORY 1 : मुंबईत असेही होते काही धडधडणारे कारखाने, ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेच नसेल

| Updated on: Mar 30, 2023 | 9:37 AM

गिरण्या सुरू होण्यापूर्वी मुंबईत रेशमाचे कपडे तयार होत होते. खत्री लोक हे काम करत असत. या लोकांना सरकार बाहेर गावांहून मुद्दाम आणून त्यांना उत्तेजन देऊन त्यांच्याकडून कारखाने चालवीत असत.

MUMBAI HISTORY 1 : मुंबईत असेही होते काही धडधडणारे कारखाने, ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेच नसेल
OLD MUMBAI
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : असे म्हटले जाते की जगभरात मुंबईला खरी ओळख मिळाली ती गिरणीमुळे. गिरणी म्हणजे सूत काढण्याचे आणि कापड विणण्याची अनेक प्रकारची यंत्रे. त्याकाळी फक्त मुंबईतच कापसाच्या 52 गिरण्या होत्या. या गिरण्या सुरु झाल्या की अवघ्या मुंबईकरांच्या कानठळ्या यंत्रांच्या घडघडाट आणि फडफडाटाने बसून जात. काळा धूर बाहेर सोडणारी एक भली मोठी चिमणी. शेकडो कामगारांची या यंत्रावर मोठ्या कुशलतेनें आणि दक्षतेने करण्याची चलाखी पाहून दंग होऊन जात असे.

कापूस कुठे साफ होतो ? कुठे पिंजला जातो ? त्याचे जाड सूत कुठे तयार ? सूताचे तंतु तयार होतात ते कसे ? बारीक सूत कुठे निघते, कुठे त्याच्या गुंड्या होतात, सुतास पीळ कसा दिला जातो ? पीळ दिलेलें सूत मागावर घालून त्याचा कसा कपडा तयार केला जातो ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ज्याने हे सर्व पाहिले तोच देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

गिरण्या सुरू होण्यापूर्वी मुंबईत रेशमाचे कपडे तयार होत होते. खत्री लोक हे काम करत असत. या लोकांना सरकार बाहेर गावांहून मुद्दाम आणून त्यांना उत्तेजन देऊन त्यांच्याकडून कारखाने चालवीत असत. शिवाय ते शिवणकामही करत असत. मात्र, यासोबतच तेव्हा मुंबईत एकूण विविध वस्तू तयार करणारे चारशे कारखाने होते.

त्यातील काही प्रमुख कारखाने

सुताचे कारखाने

मुंबईत सुताचे कारखाने 1792 पासून सुरू झाले. नागपुरी धोतरजोडा जेवढा काळ टिकेल तेवढा काळ विलायती कपडा टिकत नव्हता. गिरणीमधून निघणारे सुत हे कच्चे आणि निकस असायचे. तर हाताने काढलेले सूत हे अधिक टिकाऊ होते.

कागद गिरणी

गिरगावमध्ये कागद तयार करणारी एक गिरणी होती. यात हलक्या दर्जाचे कागद तयार होत होते. हे कागद साधारण जमा खर्चाच्या कामी येत असत. भारतात कागद बनविण्याचे एकूण कारखाने होते. त्यातील एकट्या मुंबईत 5, बंगालमध्ये 2 तर लखनौ आणि ग्वाल्हेर येथे 1 कारखाने होते.

गहू दळण्याचा कारखाना

1725 च्या सुमारास चर्चगेट येथे एक गहू दळण्याचा कारखाना होता. एक मोठा रहाट होता. त्याला जहाजासारखी बाहेरून शिडे वगैरे लावून वाऱ्याच्या वेगाने गहू दळण्याचा कारखाना होता. तो काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आला. ही मुंबईतील पहिली पवनचक्की. आता पीठ दळण्याच्या घरगुती गिरण्या निघाल्या आहेत. पण, पवनचक्कीची बात निराळीच.

बर्फाचा कारखाना

सध्या गिरगावात जेथे प्रार्थना समाज मंदिर आहे तेथेही असाच एक नवलाईचा कारखाना होता. त्याच्याजवळ गेली की कितीही तापलेला चाकरमानी थंड होत असे. हा होता बर्फ तयार करण्याचा कारखाना. हा कारखाना होण्यापूर्वी साहेबांसाठी बर्फ अमेरिकेतून येत असे.

गॅसचा कारखाना

आताची चिंचपोकळीला तेव्हा चिंचपुगळी असे म्हटले जायचे. याच चिंचपुगळीला गॅसचा जबरदस्त कारखाना होता. हा गॅस तयार करण्यासाठी दगडी कोळसा वापरत. मोठ्या भांड्यात कोळसे घालून ते तापवयाचे. कोळसे तापून त्यातून निघणारा धूर चुन्याच्या पाण्यातून किंवा दुसऱ्या काही पदार्थांतून जाऊ देऊन स्वच्छ करत. हा गॅस स्वच्छ केला नाही तर त्याचा प्रकाश कमी आणि लाल पडायचा.

पण, गॅस चुन्याच्या पाण्यातून काढला तर त्याचा प्रकाश स्वच्छ पडायचा. हा स्वच्छ गॅस पाण्याने भरलेल्या एका मोठ्या हौदात उघड्या पात्रात सोडत. गॅस जसजसे भरत जाईल तसे ते भांडे वर चढले जाते. आत असलेल्या गॅसवर भांड्याचें वजन पडून तो दाबला जाई.

भांड्यात दाबून राहिलेला हा गॅस आधी मोठ्या नळात मग त्यातून लहान लहान नळांमधून शहरभर नेण्यात येत असे. दगडी कोळशांप्रमाणेच लाकूड, तेल यापासूनही गॅस तयार करत असत.