गोविंद ठाकूर, मुंबई | सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबईत भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. जोगेश्वेरी (Jogeshwari) पश्चिमेकडील घास, फर्निचर कंपाउंडमध्ये ही यंकर घटना घडली आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास फर्निचर दुकानांना अचानक आग लागली. एकामागून एक दुकानांत आगीचा भडका होत गेला. एकाला लागून एक दुकानं असल्यामुळे या आगीत शेकडो दुकानं जळून भस्मसात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अग्निशामक दलाच्या 8 ते 10 गाड्या घडनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीचा भडका एवढा प्रचंड आहे की, सकाळी 11 वाजता लागलेली आग दुपारी 1 वाजेच्या सुमारासदेखील पूर्णपणे विझवता आलेली नाही. या आगीत किती जिवितहानी झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही.
जोगेश्वरी पश्चिमेकडील फर्निचर कंपाउंडमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. या भागात बहुतांश दुकानं फर्निचर, काचेची दुकानं आणि गोदामं आहेत. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आग विझवण्याच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. फायर ब्रिगेडने लवकर आग विझवण्याचे प्रयत्न केले असते तर बरीच दुकानं वाचली असती, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत.
दरम्यान, जोगेश्वरी पश्चिम येथे लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे. या आगीत कोणीही अडकल्याची किंवा जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अग्निशमन दल वेळेवर आले असते तर अनेक दुकाने वाचू शकली असती, मात्र अग्निशमन दल उशिरा पोहोचले, अशी स्थानिकांची तक्रार आहे. सध्या 300 ते 400 दुकाने आणि गाळे जळत आहेत, अशी माहिती स्थानिक देत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची दृश्य अत्यंत विदारक आहेत. फर्निचरच्या दुकानांतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. असंख्य दुकानांमधून अजूनही आगीचे लोट निघत आहे. लाकूड आणि इतर साहित्य जळाल्याने धुराचे आणि आगीचे लोट आकाशापर्यंत गेल्याचं भीषण चित्र इथे दिसून येतंय.