Mumbai water : पाणी जपून वापरा! मुंबईतल्या कुर्ला, घाटकोपर, लालबागमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

| Updated on: May 13, 2022 | 7:26 AM

Mumbai water supply News : येत्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल किंवा कमी दाबानं करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय.

Mumbai water : पाणी जपून वापरा! मुंबईतल्या कुर्ला, घाटकोपर, लालबागमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
नवी मुंबईत 24 तारखेला पाणी पुरवठा बंद
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतील (Mumbai Water issue) महत्त्वाच्या भागात दोन दिवस पाणीबाणी जाणवण्याची शक्यता आहे. कुर्ला, घाटकोपरसह लालबागमध्ये दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवणार आहे. महापालिकेकडून (BMC) केल्या जाणाऱ्या कामाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा प्रभावित होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर 18 मे पासून 19 मे पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विद्याविहार इथं सूक्ष्मबोगदा पद्धतीनं जलवाहिन्या वळवण्याचं पहिल्या टप्प्याचं काम सुरु होणार आहे. हे काम 18 आणि 19 मे रोजी हाती घेतलं जाईल. त्यामुळे मुंबईतल्या बहुतांश भागातील पाणी पुरवठ्यावर (Mumbai Water supply News) परिणाम जाणवले. यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. काही ठिकाणी 18 मे रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, असं पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

कुठे कुठे परिणाम जाणवेल?

पुढच्या आठवड्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल किंवा कमी दाबानं करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय. मुंबईतल्या विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, वडाळा, लालबाग, परळ या भागांतील लोकांना त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. 18 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 19 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत महापालिका मायक्रोटनलचं काम करणार आहे.

या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद!

मुंबई महापालिकेच्या एल पूर्व, एन, एम पश्चिम, एफ उत्तर या वॉर्डमधील नागरिकांना पूर्णपणे पाणीबाणी जाणवेल. कारण या भागातील पाणीपुरवठा 18 आणि 19 मे दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या भागात कमी दाबानं पाणी पुरवठा

दरम्यान, एफ दक्षिण, दादारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नथा भातनकर मार्ग, बी जे देवरुखमार्ग, गोविंदजी केणी मार्ग- नायगाव हिंदमाता, दक्षिण परळ, लालबाग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जीतीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली इथं कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल, असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. दरम्यान, पाणी पुरवठा होणार नसल्याच्या कारणानं संबंधित भागातील नागरिकांना याबाबतची नोंद घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. तसंच पर्यायी पाणी साठा आधीच ठेवण्यासोबत पाणी जपून वापरण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

पाहा स्पेशल रिपोर्ट :