ठाकरेंकडे निरोप पोहोचला, शिंदेंचे नगरसेवक…; फडणवीस दावोसमध्ये असताना पडद्यामागे मोठ्या हालचाली

मुंबईत भाजपचा महापौर बसणार की ठाकरे बंधू एकत्र येऊन मोठा चमत्कार घडवणार? संजय राऊत यांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत. वाचा सविस्तर माहिती.

ठाकरेंकडे निरोप पोहोचला, शिंदेंचे नगरसेवक...; फडणवीस दावोसमध्ये असताना पडद्यामागे मोठ्या हालचाली
uddhav thackeray raj thackeray eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jan 18, 2026 | 11:33 AM

राज्यातील २९ महापालिकांच्या निकालांनंतर मुंबईत महापौर कोणाचा होणार, सत्ता स्थापनेचा दावा कोण करणार, याचा पेच अधिक गडद होताना दिसत आहे. भाजपला ८९ आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला २८ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा महापौर बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही खुद्द एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांचीही सुप्त इच्छा आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांनी नुकतच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली. ज्यांनी स्वतःचे आमदार फोडले, त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत आहे. आमदारांना त्यांनी सुरतला ठेवले आणि आता नगरसेवकांना इथे मुंबईत कोंडून ठेवले आहे. खर तर त्यांच्यासाठी सुरत हीच सुरक्षित जागा आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतानाही जर नगरसेवक पळवले जाण्याची भीती वाटत असेल, तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी हास्यजत्रा आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

निवडून आलेले नगरसेवक हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या मनात आजही शिवसेनेबद्दल वेगळी भावना आहे. नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? त्यांच्या मनात मराठी अस्मितेची मशाल धगधगते आहे. भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळपास सर्वांनी ठरवले आहे. जरी ते आज दुसऱ्या गटात असले, तरी संपर्काची विविध साधने वापरून आमच्यापर्यंत त्यांचे निरोप पोहोचत आहेत, असाही दावा संजय राऊत यांनी केला.

ठाकरे बंधू एकत्र येणार?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. मी या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची भेट घेतली असून, त्यांच्यातही या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तटस्थपणे हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत. भाजपाकडे केवळ चारचेच बहुमत आहे आणि राजकारणात बहुमत हे पाऱ्यासारखे चंचल असते,” असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

फडणवीस वेताळासारखे हट्टी 

फडणवीस दावोसला गेले असले तरी त्यांचे लक्ष मुंबईच्या राजकारणातच आहे. ते वेताळासारखे हट्टी आहेत, पण त्यांना तरी हे मान्य होईल का की अमित शाह यांच्या पक्षाचा महापौर बसवावा? कायदा सुव्यवस्थेचे राज्य नाही, हेच एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना लपवून ठेवून सिद्ध केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Follow Us