…तर वाचले असते प्रवाशांचे प्राण, लोकलमधील त्या अखेरच्या प्रयत्नांवर फेरले पाणी, मुंब्रा दुर्घटनेत तो हलगर्जीपणा नडला

Mumbra Train Accident : मुंब्रा दुर्घटनेने लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पु्न्हा ऐरणीवर आला आहे. लोकल ही मुंबईकरांची जणू जीवनवाहिनीच आहे. पण मुंब्रा अपघातामुळे प्रवाशांचा जीव किती कवडीमोल आहे हे समोर आले. त्यातच हा एक हलगर्जीपणा झाला नसता तर कदाचित प्रवाशांचा जीव वाचला असता.

...तर वाचले असते प्रवाशांचे प्राण, लोकलमधील त्या अखेरच्या प्रयत्नांवर फेरले पाणी, मुंब्रा दुर्घटनेत तो हलगर्जीपणा नडला
मुंब्रा लोकल ट्रेन अपघात
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 10, 2025 | 10:17 AM

मुंब्रा दुर्घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईकरांची जणू जीवनवाहिनी असलेल्या लोकल अपघातात काल चार जणांचा जीव गेला. या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यातील चाौघांवर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान या अपघातातील चार जणांचा मृत्यू टाळता आला असता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही दुर्घटना टळली असती असा नवीन दावा समोर येत आहे. एका हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा नाहक जीव गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

चेन खेचली पण लोकल थांबली नाही

प्रवाशांनी चेन खेचली, तरीही लोकल थांबली नाही असा आरोप करण्यात येत आहे. मुंब्रा रेल्वे अपघातात प्रवाशांची बॅग दुसर्‍या लोकलमधील प्रवाशाला लागल्याने १३ जण खाली पडले. यात चौघांचा मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर लोकलमधील प्रवाशांनी तीन ते चार वेळा चेनह खेचली. तरीही ट्रेन थांबली नाही. मोटरमनने थेट ठाण्याला लोकल थांबवली. अपघातात मृत्यू झालेल्या केतन सरोज याचा मित्र आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी दीपक शिरसाठ याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात याबाजूने तपास होण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोघांचा तो प्रवास ठरला अखेरचा

दुर्घटनेत मृत पावलेला केतन सरोज (२३) आणि दीपक हे दोघेही उल्हासनगरातील रहिवासी असून . दोघेही ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमध्ये कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजता शहाड येथून कसारा सीएसएमटी फास्ट लोकल पकडली. डोंबिवलीत आणि दिव्यात गर्दी झाली. मुंब्रा काही अंतरावर अरुंद वळणावर लोकलमधील बाजूचे अंतर कमी झाले. लोकलमधील एका प्रवाशाची बॅग तिसऱ्या डब्यातील प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी पडले. केतन आणि दीपकचा हा प्रवास अखेरचा ठरला. प्रवाशी पडले तेव्हा, लोकलमधील प्रवाशांनी चेन खेचली होती. पण तरीही मोटरमॅनने लोकल थांबवली नाही असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केल्याने या बाजूने तपासाची मागणी करण्यात येत आहे.

वेळेवर ट्रेन थांबली असती तर वाचले असते जीव

मोटरमॅनने स्थितीचे गांभीर्य ओळखत वेळेवर ट्रेन थांबवली असती तर जीव वाचले असते असे प्रत्यक्षदर्शी म्हणाले. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकेचा अभाव होता. तर ;घटनास्थळावरून काहींना रुग्णवाहिका मिळाली.तर काहींना टेम्पोतून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.