Sanjay Raut : संजय राऊत लोचक आणि लाळगोटे, त्यांनी खासदारकीसाठी पत्रकारिता गुंडाळली; शिंदे गटाकडून शाब्दिक हल्ला

| Updated on: Sep 16, 2023 | 3:33 PM

Sanjay Raut : संजय राऊत हे पत्रकार म्हणून राहिले आहेत का? संजय राऊत लोचक आणि लाळगोटे, त्यांनी खासदारकीसाठी पत्रकारिता गुंडाळली, असं म्हणत शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर घणाघात करण्यात आला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत लोचक आणि लाळगोटे, त्यांनी खासदारकीसाठी पत्रकारिता गुंडाळली; शिंदे गटाकडून शाब्दिक हल्ला
Follow us on

मुंबई | 16 स्पटेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाकडून शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकार म्हणून हजेरी लावणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्याला आता शिंदे गटाने उत्तर दिलं आहे. संजय राऊत हे पत्रकार म्हणून राहिले आहेत का? त्यांनी त्यांची पत्रकारिता कवडीमोल करून टाकली आहे. संजय राऊत यांनी पत्रकारिता खुंटीला टांगून ठेवली आहे. त्यांनी पत्रकारितेची नीतिमत्ता सोडली आहे. जे लोक सनातन धर्मविषयी बोलत आहेत. त्यांच्याबद्दल प्रश्न का विचारलं नाही. त्यांना पुरणपोळीचं जेवण चाललं. तुमची पत्रकारिता खासदारकीसाठी गुंडाळली आहे. संजय राऊत लोचक आणि लाळगोटे आहेत, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

नांदेडमध्ये युवराजांचा दौरा होता. त्यांना बर्गर आणि कोल्ड कॉफी हवी होती. म्हणून कार्यकर्त्यांना हैद्राबाद जावं लागल आणि तुम्ही पंचतारांकित काय सांगता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शासकीय निवासस्थानी राहत आहेत. जेव्हा इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. तेव्हा ती काय कोणत्या चाळीत की झोपडपट्टीत ठेवली होती का? तेव्हा जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांना खर्च आणि पंचतारांकीत हॉटेल खर्च दिसला नाही का?? त्यांना पूरणपोळी आणि मोदकाचे जेवण खायला घातलं आणि आता बोलत आहात, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईतील गणेश मंडळाचे जागतिक आकर्षण आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध उठवले आणि पुन्हा एकदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा सुरू केली आहे. शिवसेनेच्या शाखेत स्पर्धेचे फॉर्म मिळणार आहेत. मूर्तिकार आणि सजावट यासाठी स्पर्धा असणार आहे. पहिले पारितोषिक 5 लाखांचं, दुसरे बक्षीस 3 लाखांचं, तिसरे बक्षीस 2 लाख रूपयांचं तसंच 50 गणेश मंडळाला उत्तेजनार्थ म्हणून 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह देखील दिलं जाणार आहे, असंही नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितलं.