रेल्वे जाण्यापूर्वी आधी तिकीट काढा, अन्यथा १८ लाखांमध्ये आणखी एक भर पडेल

मागील वर्षी याच कालावधीत 12 लाख 3 हजार खटल्यांद्वारे 61 कोटी 62 लाख रुपयांची वसूली केली होती. त्यात आता 50.32 टक्के वाढ दिसत आहे.

रेल्वे जाण्यापूर्वी आधी तिकीट काढा, अन्यथा १८ लाखांमध्ये आणखी एक भर पडेल
mumbai-local
Image Credit source: mumbai-local
| Updated on: Mar 03, 2023 | 8:32 AM

मुंबई : मुंबईत रेल्वे (Mumbai Local) प्रवास हा सर्वात सोयीस्कर आहे. लाखो प्रवाशी लोकल ट्रेनचा (Indian Railway) वापर करतात. यामुळे लोकल सेवेला मुंबईची लाइफलाइन (Mumbai lifeline local) म्हटले जाते. रेल्वेचा स्वस्त अन् मस्त प्रवास असला तरी अनेक जण तिकीट काढत नाहीत. आता अशा प्रवाशांना रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. विना तिकीट प्रवाश करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. अनेक ठिकाणी तिकीट तापसणीस कारवाई करत आहेत. गेल्या 11 महिन्यांत 18 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यांकडून 100 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करताना आधी तिकीट काढूनच प्रवास कराल, अन्यथा तुम्हालाही मोठा दंड भरावा लागेल.

18 लाख जणांना दंड


मुंबई विभागात एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत विना तिकीट प्रवास करणाऱ्या 18 लाख 8 हजार प्रवाशांकडून 100 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला. 2022 च्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते 2023 च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत 100 कोटी 31 लाख रुपयांची भर पडली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ

तर मागील वर्षी याच कालावधीत 12 लाख 3 हजार खटल्यांद्वारे 61 कोटी 62 लाख रुपयांची वसूली झाली होती. त्यात आता 50.32 टक्के वाढ दिसत आहे. 1 एप्रिल 2022 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 18 लाख 8 हजार प्रकरणांमधून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. त्यात एसी लोकलमधील 25 हजार 781 प्रकरणांमधून 87 लाख 43 हजार रुपये आणि प्रथम श्रेणी डब्यांमधील 1 लाख 45 हजार प्रकरणांमधून 5 कोटी 5 लाख रुपयांचा समावेश आहे. यापूर्वी एका आर्थिक वर्षात, 2019-20 मध्ये मुंबई विभागात सर्वाधिक कमाई 15 लाख 73 हजार प्रकरणांमधून 76 कोटी 82 हजार रुपये होती.

नियमित तपासणी मोहीम

उपनगरी आणि गैर-उपनगरीय / मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. यामुळे तिकीट न कढणाऱ्या प्रवाशांकडून चांगला दंड वसूल केला जातो. तिकीट तापसणी करताना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी अत्यंत सौजन्याने आणि चांगल्या वर्तनाचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तक्रारी कमी झाल्या. त्यांनी असंख्य प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्र करून त्यांचे मानवी दृष्टिकोन दाखवून दिले आहे.