मुंबईत भर दुपारी काळोख, गणेशोत्सवावर पावसाचे सावट, राज्यात कुठे, काय स्थिती?

मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे तर नांदेड, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत भर दुपारी काळोख, गणेशोत्सवावर पावसाचे सावट, राज्यात कुठे, काय स्थिती?
| Updated on: Aug 29, 2025 | 5:54 PM

गेले दोन दिवस रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज दुपारपासूनच जोर धरला आहे. मुंबई शहरांपासून पश्चिम उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, वडाळा, लालबाग, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे यांसारख्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या ३ तासांसाठी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेला जोरदार पाऊस आणखी काही काळ असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

नांदेडमध्ये पूरस्थिती, शाळांना सुट्टी

मुंबईबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक भागात पाणी शिरले आहे. कंधार आणि माळाकोळी मंडळांमध्ये सर्वाधिक २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी आणि आसना नद्यांना पूर आला आहे. पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि भारतीय सैन्य दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यातील ५,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस

वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सोंडा ते अनसिंग दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले आहेत. मानोरा तालुक्यातील पारवा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. ज्यामुळे टिपटाळा, वाघजाळी, ब्रम्ही, जितापूर आणि इतर अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सध्या पावसाची ही स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us