Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या, ED ची नोटीस, कोट्यवधींची माया जमा केल्याचा आरोप

| Updated on: May 25, 2022 | 11:55 AM

यशवंत जाधव हे शिवसेनेचा राइट हँड आहेत. मुंबई महापालिकेचे पाच वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जाधव यांनी एक हजार कोटी रुपयांच्या आसपास माया जमवली आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या, ED ची नोटीस, कोट्यवधींची माया जमा केल्याचा आरोप
शिवसेना उपनेते यशवंत जाधव
Follow us on

मुंबईः शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीतर्फे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. स्थायी समिती सभापती असताना त्यांनी हजारो कोटींची माया जमवली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  कालच भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya)यांनी यशवंत जाधव, श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे व्यावसायिक संबंध असून ते हेमंत करकरेंच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असा आरोप केला होता. यशवंत जाधव यांची आयकर विभागाच्या वतीने चौकशी सुरु असून ईडीतर्फेही त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.  आता या प्रकरणात यशवंत जाधवांना वारंवार नोटिसा येणार असून त्यांची कसून चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले.

‘काळा पैसा पांढरा केला’

यशवंत जाधव यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘यशवंत जाधव यांनी प्रधान डीलर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून सगळा काळा पैसा पांढरा केला आहे. 1 रुपयाचा शेअर थेट 500 रुपये होतो आणि सगळा काळा पैसा हा पांढरा केला जातो, असा हा प्रकार आहे. हा सगळा पैसा जाधव यांनी आखाती देशात गुंतवल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. याच संदर्भात यशवंत जाधवांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोण आहेत यशवंत जाधव?

यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच झाली. शाखा प्रमुख ते अध्यक्षपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आहे. 1997 मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे.

‘बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळ्यातही हेच’

मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू झाला होता. त्यांना देण्यात आलेलं बुलेट प्रुफ जॅकेट हे नकली होतं. बिमल अग्रवाल यांच्या कंपनीद्वारे हे जॅकेट पुरवण्यात आले होते. अग्रवाल हा यशवंत जाधव यांच्यासाठी काम करत होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरेंचा राइट हँड’

यशवंत जाधव हे शिवसेनेचा राइट हँड आहेत. मुंबई महापालिकेचे पाच वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जाधव यांनी एक हजार कोटी रुपयांच्या आसपास माया जमवली आहे. बिमल अग्रवाल आणि यतीन यशवंत जाधव यांची रजिस्टर्ड पार्टनरशिप कंपनी आहे. समर्थ इरेक्ट्रर्स अँड डेव्हलपर्सं. याच कंपनीने आत्ता मलबार हिलमध्ये 80 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट विकत घेतला आहे. याच कंपनीकडून श्रीधर पाटणकरांनी टीडीआर विकत घेतला आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

‘राऊतांनी आधी मनसुख हिरेनवर बोलावं’

संजय राऊत हे काहीही बोलतात. ते हास्यास्पद आहेत. त्यांनी स्टॅलिन आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात नंतर बोलावं आघी मनसुख हिरेनसंदर्भात स्पष्टीकरण द्यावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली होती.. असा आरोप सोमय्यांनी केला आहे.