मुंबई : मुंबईसह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरी पुढे आहे. मुंबईत (Mumbai) आज तापमान 35 अंशावर तर भिवंडीत 41 अंशावर तापमान पोहचले आहे. विदर्भात उष्णतेची लाट (Heat) आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे असण्याची शक्यता आहे. यामुळे यादरम्यान नागरिकांना आपल्या आरोग्याची (Health Care) विशेष काळजी ही घ्यावी लागणार आहे.
अशाप्रकारे घ्या शरीराची काळजी
उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने पाणी जास्त पिण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जात आहे. सध्या पारा वाढल्यामुळे आपले शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे महत्वाचे काही काम नसेल तर घराच्या बाहेर जाणे देखील टाळणे फायदेशीर आहे. जर घराच्या बाहेर पडणार असाल तर रूमाल किंवा छत्रीच घेऊन घराच्या बाहेर पडा. सतत पाणी किंवा लिंबू शरबत पिण्याचा प्रयत्न करा. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आहेत. ही फळे डिहायड्रेशनची समस्या दूर करतात. याचा देखील आहारात समावेश करा.
उन्हाळ्यात काकडी, पालक, ताक, कलिंगड यांचा देखील आहारात समावेश करा. काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे हे व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि फोलेटमध्ये समृद्ध असतात. त्यात बरीच महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. उन्हाळ्यात ही फळं खाऊन तुम्ही स्वत: ला हायड्रेटेड ठेवू शकता.
ही लक्षणे दिसली की डाॅक्टरांचा सल्ला घ्या!
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, बेचैन अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी लक्षणे असतील तर लगेचच डाॅक्टरांकडे जा. तसेच एखाद्या व्यक्तीला ही लक्षणे आढळली तर संबंधीत व्यक्तीस हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर असावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
संबंधित बातम्या :
Health Care Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ‘या’ खास फळांचा आहारात समावेश करा!