Narayan Rane: उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ‘शिव्या संपर्क भाषण’; नारायण राणेंचा घणाघाती हल्ला

Narayan Rane: नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी राणेंनी थेट सामना वाचून दाखवत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील एका एका मुद्द्याचा समाचार घेतला.

Narayan Rane: उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे शिव्या संपर्क भाषण; नारायण राणेंचा घणाघाती हल्ला
narayan rane
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2022 | 5:49 PM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं, हिंदुत्वाचं (hindutva) नाव घ्यायचं आणि छापत बसयाचं. भ्रष्टाचार म्हणत नाही मी. असा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. चुकीच्या माणसाला चुकून संरक्षण दिलं का? 1991 पासून मला संरक्षण आहे. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं. तेव्हापासून मला संरक्षण दिलं आहे. आता तुम्ही दहा वर्ष सत्तेत राहिलात तरी माझ्या 8 महिन्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचं (cm uddhav thackeray) भाषण विनोदी होतं. चेष्टा मस्करी आहे. त्यांचं हे शिवसंपर्क अभियान नव्हतं. त्यांचं भाषण हे शिव्या संपर्क भाषण होतं. उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण टोटल बोगस होतं. एकही घोषणा नाही. कारभार जमत नाही. त्यामुळे शिव्या घालण्यापलिकडे त्यांनी काहीच केलं नाही. कालच्या सभेला फेरीवाले आणून बसवले. त्यांचा शिवसेनेशी काय संबंध? असा सवाल केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) केला.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी राणेंनी थेट सामना वाचून दाखवत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील एका एका मुद्द्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हटलं होतं. त्याचाही राणेंनी समाचार घेतला. यांना नवाब भाई चालतात मराठी मुन्नाभाई चालत नाही. नवाब भाईच्या मांडिला मांडी लावून बसतात. कारण ती दाऊदची माणसं आहेत ना. आपल्याच भावाला मुन्नाभाई म्हणतात. लोचा हा शब्द वापरतात. लोचा ही काय भाषा आहे. वाह रे सुसंस्कृत मुख्यमंत्री, अशी टीका राणेंनी केली.

भेंडी वाटली की फरसबी वाटली?

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तुम्ही नांदलात ना सोबत. 25 वर्षाहून अधिक काळ युती केली ना. मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपद घेऊनही काम करत नाही. कामाची माहिती नाही. कसलं कर्तृत्व आलं? ना मंत्रालय, ना कॅबिनेट, ना अधिवेशन कधीही जात नाही. असा कसा मुख्यमंत्री असतो. बढाया मारू नका. अंगाशी येईल. तुकडे तुकडे करू म्हणता. भाजी वाटली का भेंडी वाटली की फरसबी वाटली? तुकडे तुकडे करायला. पुळचट माणसं आहेत म्हणून शिवसेनेची ही दशा आहे. संजयची संगत भोवली. त्यामुळे असे शब्द त्यांच्या तोंडी आले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

पूर्वी काँग्रेसवर आरोप करायचे

यांच्या हृदयात राम आणि हाताला काम आहे असं ते म्हणतात. कसलं. यांच्या हृदयात द्वेष आणि मत्सर असंच आहे, अशी टीका त्यांनी केली. पूर्वी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचं ते म्हणायचे. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं सांगत आहेत, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. त्यांच्याकडे काहीच मुद्दे नसतात तेव्हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांना ते हात घालत असतात, असंही त्यांनी सांगितलं.