ना ढाक्कुमाकुमचा ताल, ना डीजेचा आवाज, दहीहंड्या रद्द करत गोविंदा पथकांचे स्तुत्य पाऊल

| Updated on: Aug 12, 2020 | 4:25 PM

बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरात गोपाळकाल्याचा दरवर्षी जल्लोष असतो (Navi Mumbai Govinda Pathak).

ना ढाक्कुमाकुमचा ताल, ना डीजेचा आवाज, दहीहंड्या रद्द करत गोविंदा पथकांचे स्तुत्य पाऊल
Follow us on

नवी मुंबई : कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम पडला आहे. कोरोनाच्या कचाट्यातून सण, उत्सव, समारंभसुद्धा सुटलेले नाहीत. कोरोना संकटामुळे दरवर्षी जोरदार आणि उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवावरही विरजण पडलं आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक आणि घरगुती अशा जवळपास 300 ते 400 दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत (Navi Mumbai Govinda Pathak).

बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरात गोपाळकाल्याचा दरवर्षी जल्लोष असतो. गोविंदा पथक वाजत गाजत, दहीहंडी फोडण्यासाठी शहरभर फिरत असतात. मात्र, यावर्षी जवळपास सर्वच दहीहंड्या रंद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे काही भागांमध्ये गोविंदा पथकांकडून मेडिकल किटचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली (Navi Mumbai Govinda Pathak).

हेही वाचा : मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, जन्माष्टमी सोहळाही घरच्या घरी साजरा

नवी मुंबईत गेल्या 13 वर्षांपासून नावाजलेले ‘ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक’ यंदा एका अनोख्या उपक्रमासोबत दहीहंडी साजरा करत आहे. या पथकाकडून ऐरोली कोळीवाडा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन घरोघरी मेडिकल किट, व्हिटॅमीन सीच्या गोळ्या, मास्क, सॅमिटायझरचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर या पथकांने सर्व गोविंदा पथकांना साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं.

ऐरोली सेक्टर 15 येथे इच्छापूर्ती गणेश मंदिरा जवळील चौकात दरवर्षी सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त रकमेच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोना संकट काळात गर्दी टाळण्यासाठी, संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी 11 लाखांचे पारितोषिक असलेली दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी घेतला.