ऊर्दु भाषा भवन बांधायचं तर मातोश्रीत बांधा, आग्रीपाड्यात नकोच; नितेश राणे आक्रमक

कोणतंही प्रशिक्षण केंद्र इथं बांधलं जाणार नाही. हे ठणकावून सांगण्यासाठी आलो आहे. प्रशिक्षण केंद्र बांधायचं तर मातोश्री टूची नवीन जागा आहे. इमारत तयार आहे

ऊर्दु भाषा भवन बांधायचं तर मातोश्रीत बांधा, आग्रीपाड्यात नकोच; नितेश राणे आक्रमक
ऊर्दु भाषा भवन बांधायचं तर मातोश्रीत बांधा, आग्रीपाड्यात नकोच; नितेश राणे आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 04, 2022 | 2:41 PM

मुंबई: आग्रीपाडा येथे ऊर्दु भाषा भवन बांधलं जाणार आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात आग्रापाड्यात आंदोलन करण्यात आलं आहे. ऊर्दु भवनच्या जागेवर आयटीआय केंद्र उभारण्यात यावं, अशी मागणी करतानाच ऊर्दु भाषा भवन उभारायचंच असेल तर मातोश्री टू तयार होत आहे. तिथेच उभारा, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

ज्या जागेवर ऊर्दु भाषा भवन उभारण्यात येणार आहे. त्या प्रशिक्षण केंद्रावर आयटीआय केंद्र उभारण्यात येणार होतं. पण आयटीआय केंद्राचं आरक्षण रद्द करून अचानक ऊर्दु भाषा भवनला मान्यता देण्यात आली. दहा आठवड्यात त्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हक्काच्या आयटीआयच्या जागेवर घाईने ऊर्दु प्रशिक्षण केंद्र बांधण्याची गरज काय आहे? तुम्हाला दुसरीकडे जागा मिळत नाहीये का? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

आम्ही कोणत्याही जात, धर्म आणि भाषेच्या विरोधात नाही. कुणाला काय करायचं ते करा. पण आमच्या हक्काच्या जागेवर काहीही बांधलं जात असेल, आमच्या मुलांचं भविष्य अंधारात टाकलं जात असेल तर आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे हिंदुंवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

कोणतंही प्रशिक्षण केंद्र इथं बांधलं जाणार नाही. हे ठणकावून सांगण्यासाठी आलो आहे. प्रशिक्षण केंद्र बांधायचं तर मातोश्री टूची नवीन जागा आहे. इमारत तयार आहे. तिथे बोर्ड लावा आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करा, असं सांगतानाच आदित्य ठाकरे वारंवार रोजगार गेला, रोजगार गेला म्हणतात. तुझ्याच वडिलांने हा रोजगार घालवला आहे, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत केली.

काहीही झालं तरी आम्ही तिथे ऊर्दू भाषा भवन होऊ देणार नाही. लर्निंग सेंटर होऊ देणार नाही. ती जागा आयटीआयसाठी दिली होती आणि त्या ठिकाणी आयटीआय भवनच उभारलं गेलं पाहिजे.

ही आमची प्रखर भूमिका आहे. याचा आम्ही पाठपुरावा करू. सुरुवात आम्ही केली नाहीये, त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही त्यांच्या हक्काच्या जागेवरती गेलो नाहीये. ते आमच्या हक्काच्या जागेवर आलेले आहेत. त्यांना जर जागा हवी असेल तर मातोश्री या ठिकाणी त्यांनी जागा पहावी. नवाब मलिक यांच्या घरी त्यांनी जागा पहावी आणि तिथे त्यांच्या ऊर्दू भवन बांधावं, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील सरकार घटनाबाह्य सरकार जर असेल तर आदित्य ठाकरे सुरक्षा घेऊन का फिरत आहेत? त्यांनी सुरक्षा सोडावी. हिंमत असेल तर सुरक्षा काढून एकटे फिरावे. खरंच मांजर नसशील तर एकटा फिर. मग समजेल, शेंबड्या मुलासारखं बोलू नकोस, अशी टीकाही त्यांनी केली.

Follow Us