Devendra Fadnavis : विदर्भच नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मोठा पक्ष आहोत; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

| Updated on: Aug 13, 2022 | 10:26 AM

शेतकऱ्यांना मदत लवकरच मिळेल. किती नुकसान झाले, याची आकडेवाडी गोळा करणे अद्याप सुरू आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यांना मदत मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis : विदर्भच नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मोठा पक्ष आहोत; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कामाचा आवाका पाहता आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे आमचा पक्ष वाढेल, पाळेमुळे अधिक घट्ट होतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांची काल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आज प्रतिक्रिया देताना त्यांनी बावनकुळेंच्या कामाविषयी माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे हे लहानपणापासून भाजपाचे (BJP) कार्यकर्ते आहेत. एक लहान कार्यकर्ता म्हणून सुरुवात त्यांनी केली. जिल्हा परिषद, विरोधीपक्ष नेते, आमदार, मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. पक्षाने ज्या ज्या वेळी जबाबदारी दिली, ती उत्तम सांभाळली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीविषयीदेखील त्यांनी यावेळी भाष्य केले.

‘त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला’

ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. प्रदेश महामंत्री म्हणून त्यांच्याकडे काही दिवस जबाबदारी होती. त्यावेळी राज्यभर फिरून त्यांनी पक्षाची बांधणी केली. ओबीसींच्या प्रश्नावर सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे लढले. ज्यावेळी ओबीसींचे आरक्षण गेले, त्यावेळी त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे ओबीसींचा चेहरा तर ते आहेतच. विदर्भात आमची ताकद जास्त होती, आता पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातही आम्ही मोठा पक्ष आहोत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर संधी

चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आता भाजपा प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचे लोकसभा आणि विधानसभेतील टार्गेटही सांगून टाकले आहे. लोकसभेमध्ये भाजपा आणि शिवसेना मिळून 45पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200पेक्षा जास्त जागा निवडून आणणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘शेतकऱ्यांना लवकरच मदत’

शेतकऱ्यांना मदत लवकरच मिळेल. किती नुकसान झाले, याची आकडेवाडी गोळा करणे अद्याप सुरू आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यांना मदत मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मदत लवकरच मिळणार असल्याचे सांगितले.