तरूणांकडे आज रोजगार नाही, पण दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जातेय : प्रविण दरेकर

| Updated on: Jul 05, 2021 | 8:02 PM

"तरूणांकडे आज रोजगार उपलब्ध नाही, परंतु त्यांना दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जात आहे" असं मत व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

तरूणांकडे आज रोजगार नाही, पण दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जातेय : प्रविण दरेकर
Follow us on

मुंबई : “तरूणांकडे आज रोजगार उपलब्ध नाही, परंतु त्यांना दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जात आहे. दारू, तंबाखू, गुटखा अशा व्यसनाच्या वस्तू व अंमली पदार्थ सहज सर्वत्र मिळतात,” असं मत व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. गेल्या 4 दशकांपासून दारू विक्रीचे परवाने दिले जात नव्हते, परंतु आघाडी सरकार ते खुले करणार असल्याची माहिती मिळत आहे, असंही दरेकर यांनी नमूद केलं. ते मुंबईतील आझाद मैदानावर व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली असताना बोलत होते. यावेळी त्यांनी आंदोलकांकडून त्यांची भूमिकाही समजून घेतली (Pravin Darekar criticize Thackeray government over Alcohol ban removal in Chandrapur).

चंद्रपुरमधील दारुबंदी हटविण्याचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा

प्रविण दरेकर म्हणाले, “चंद्रपूरची दारू बंदी उठविण्याला कारणीभूत ठरणाऱ्या रमनाथ झा समितीचा अहवाल अनेकदा मागणी करूनही मिळत नाही. अहवाल का लपवला जात आहे? जे सुरू आहे ते अत्यंत खेदजनक आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी निर्णय उठविल्याच्या निर्णयाबद्दल राज्यातील आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यसन मुक्त मंचामार्फत आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलंय.”

“दारुबंदीचा विषय गंभीर असून विधान परिषदेत मांडणार”

“या आंदोलनात राज्यभरातून विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होत रोष व्यक्त केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत आंदोलन केले गेले आहे. हा विषय गंभीर असून हा विषय विधान परिषदेत मांडणार आहे,” असं आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्याचा निषेधार्थ आझाद मैदान येथे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या आंदोलनाची दखल घेऊन जवळ जवळ 14 संघटनांची निवेदने स्वीकारल्याची माहितीही दरेकरांनी दिली.

“उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले तर ते सहज निर्णय रद्द करू शकतात”

प्रविण दरेकर म्हणाले, “दारू बंदी हटविण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळात घेण्यात आला असला, तरी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले तर ते सहज निर्णय रद्द करू शकतात. राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही राज्यसरकार संवेदनहीन, गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.”

“वडेट्टीवारांच्या अट्टाहासामुळे चंद्रपूरमधील दारुबंदी हटवली”

दरेकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दारू बंदी लागू आहे, समाजातील विविध घटकांमुळे राज्य सरकारला दारू बंदी करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील दारू उठविण्यासाठी आग्रही राहिलेले आघाडी सरकारचे मंत्री विजय वडेट्टिवार यांची अट्टहासी भूमिका राहिली होती. त्यांच्या पुढाकाराने प्रथम चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि नंतर राज्याचे प्रधान सचिव राहिलेले रमानाथा झा यांच्या अध्यक्षतेखाली बंदी उठविण्यासाठी सुयोजित प्रयत्न केले गेले.”

“दारुबंदी हटवण्यामागे मोठ्या पातळीवरचे आर्थिक हितसंबंध”

“या सर्व कार्यवाही मागे विशिष्ट हेतु आणि मोठ्या पातळीवरचे आर्थिक हित कारणीभूत अशा व्यक्तिगत लाभासाठी दारू बंदी उठवली गेली. यासाठी दिलेले कायदा सुव्यवस्था व अवैध दारू विक्रीची कारणे समोर केली जात आहे. जे की वस्तुस्थिला धरून नाहीत. दारू बंदी अमलबजावणी शासन प्रशासनाच्या अपयशामुळे निर्माण झालेला असंतोष, दारू बंदी उठविण्याच्यासाठी सोयस्कर पणे वापरला जात आहे,” अशी टीकाही दरेकर यांनी केली.

हेही वाचा :

चंद्रपुरात पुन्हा ‘चिअर्स’, तब्बल 6 वर्षानंतर दारु विक्री सुरु, दुकानांसमोर मद्य शौकिनांची रेलचेल

‘चंद्रपूरमधील दारूबंदी लागू करा, अन्यथा क्रांती दिनी पुरस्कार परत करणार’, पुरस्कार्थींची घोषणा

चंद्रपूर दारूबंदी उठविण्याचा गडचिरोलीतील 500 गावांकडून निषेध, निर्णय मागे घेण्याचीही मागणी

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize Thackeray government over Alcohol ban removal in Chandrapur