जणगणनेत 8 कोटी चुका नाहीत, एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित; चव्हाणांकडून फडणवीसांची पोलखोल

| Updated on: Jul 13, 2021 | 4:36 PM

केंद्र सरकारने केलेल्या जातीनिहाय आणि आर्थिक जनगणनेत (एसईसीसी) 8 कोटी चुका असून त्यात एकट्या महाराष्ट्रातील 69 लाख चुका आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. (prithviraj chavan exposed devendra fadnavis over empirical data for OBC reservation)

जणगणनेत 8 कोटी चुका नाहीत, एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित; चव्हाणांकडून फडणवीसांची पोलखोल
prithviraj chavan
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने केलेल्या जातीनिहाय आणि आर्थिक जनगणनेत (एसईसीसी) 8 कोटी चुका असून त्यात एकट्या महाराष्ट्रातील 69 लाख चुका आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याची काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे. एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे फडणवीस तोंडघशी पडले आहेत. (prithviraj chavan exposed devendra fadnavis over empirical data for OBC reservation)

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत फडणवीस यांची पोलखोल केली आहे. 2011 साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत 8कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात 69 लाख चुका आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 5 जुलै 2021 रोजी विधानसभेत बोलताना सांगितलं होतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहण्यासाठी केंद्र सरकारने एसईसीसी डेटा राज्य सरकारला पुरवला पाहिजे, याबाबतचा ठराव राज्य सरकारने विधानसभेत आणला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी हे चुकीचे वक्तव्य करून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अहवाल काय सांगतो?

याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती आणि आकडेवारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने संसदेतील स्टँडिंग कमिटी समोर मांडलेल्या 27 व्या अहवालात सुस्पष्ट दिलेली आहे. 2010 साली यूपीए सरकारने जातनिहाय आणि आर्थिक जनगणना (एसईसीसी) करण्याचे ठरवले होते. त्यानुसार 29 जून 2011 रोजी काम सुरू झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत असलेले रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि केंद्रीय शहरी आवास मंत्रालय या तीन मंत्रालयांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या जनगणनेचे काम 2016 साली पूर्ण झाले. या अहवालातील पान क्रमांक 10 वरील माहितीनुसार,”रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, एसईसीसीच्या जनगणनेतील सर्व माहितीचे विश्लेषण झाले आहे आणि 98.87% व्यक्तींच्या डेटामध्ये कोणतीही त्रुटी नाही”, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यावरून फडणवीस यांनी सभागृहाला चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचं स्पष्ट होत आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी आकडा फुगवून सांगितला

याच अहवालात पुढे नमूद केले आहे की, एसईसीसी मध्ये एकूण लोकसंख्या 118,63,03,770 एवढी नोंदवली आहे. त्यापैकी 1,34,77,030 एवढ्या नोंदीमध्ये काही चुका आढळल्या आहेत. संपूर्ण देशासाठी हे प्रमाण फक्त 1.13% आहे. सदर चुका दुरुस्त करण्यासाठी Claims and Objections Tracking System (COTS) ही प्रक्रियादेखील अनेक राज्यात राबवली गेली. या (COTS) प्रक्रियेअंतर्गत उत्तर प्रदेशातील 2.09.182 तर राजस्थानातील 45,550 चुका दुरुस्त करण्यात आल्या. दुर्दैवाने फडणवीस यांनी एसईसीसी जनगणनेतील चुकांचा आकडा फुगवून सांगितला आणि सभागृहातील ओबीसी आरक्षण अशा अत्यंत महत्वाच्या विषयावरील चर्चा भरकटवली, असा आरोपही त्यांनी केला आहे. (prithviraj chavan exposed devendra fadnavis over empirical data for OBC reservation)

 

संबंधित बातम्या:

8 कोटी चुका आहे, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? : उद्धव ठाकरे

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणांवरुन विधानसभेत खडाजंगी

चार दिवस लसीकरण बंद करून रेकॉर्ड केल्याचा दावा करायचा हा पोरखेळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला

(prithviraj chavan exposed devendra fadnavis over empirical data for OBC reservation)