राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप, बीडमध्ये 12 तासात 435 मिमी पाऊस

| Updated on: Oct 19, 2019 | 3:07 PM

राज्यभरात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुंबईत मध्यरात्रीपासूनच रिमझीम पाऊस पडतो आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप, बीडमध्ये 12 तासात 435 मिमी पाऊस
Follow us on

मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुंबईत मध्यरात्रीपासूनच रिमझीम पाऊस पडतो आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः दाणादाण (Rain in Maharashtra) उडवली. मागील दिवसांपासून बीड जिल्हा कोरडा ठाक होता. मात्र, रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पुणे, औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही पावसानं हजेरी लावली.

बीडमध्ये 12 तासात तब्बल 435 मिमी पावसाची नोंद झाली. माजलगाव परिसरात सर्वात जास्त, तर सर्वात कमी पाऊस परळी आणि शिरूर कासार तालुक्यात झाला. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास उमेदवारांना अडथळा येत आहे. कोथरुडमधील चंद्रकांत पाटलांची प्रचार सांगता रॅली  देखील पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता ही दुचाकी रॅली सुरु होणार होती.

औरंगाबादमध्येह पावसाने हजेरी लावली आहे. ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीवर पाणी फिरले आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोकांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी आहे. सामान्य नागरिकांसह उमेदवार आणि कार्यकर्ते देखील 9 वाजले असतानाही घरातच असल्याचं पाहण्यात आलं.

या पाऊसाने राजकीय पक्षांच्या पदयात्रा, बाईक रॅलीला चांगलाच ब्रेक लागला आहे. आकाशात काळ्या ढगांचं प्रमाण जास्त असल्याने पाऊस दिवसभर पडेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. सोलापूर जिल्हयात आणि शहरात सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे सकाळपासून सूर्यदर्शन देखील झाले नाही.

सिंधुदुर्गला देखील परतीच्या पाऊसाने झोडपले आहे. येथे जवळपास तासाभराहून अधिक वेळ मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. उष्णता वाढलेली असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा आला आहे.

विशेष म्हणजे शुक्रवारी (18 ऑक्टोबर) राज ठाकरे पुण्यात हडपसर येथे आले असताना त्यांच्या सभेवेळी देखील पावसाने काहीशी हजेरी लावली होती. मात्र, त्यांच प्रमाण कमी असल्यानं सभेत कोणताही मोठा व्यत्यय आला नाही. आज मात्र, राजकीय सभांवर पावसाचं सावट राहणार आहे.