महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीवर राज ठाकरे यांच्याकडून चिंता व्यक्त, म्हणाले, ‘…तेव्हा मात्र भीती वाटते’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनेताला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आषाढीच्या शुभेच्छा देत असतानाच सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर रोखठोकपणे भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीवर राज ठाकरे यांच्याकडून चिंता व्यक्त, म्हणाले, ...तेव्हा मात्र भीती वाटते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil | Updated on: Jul 17, 2024 | 5:06 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांच्याकडून या ट्विटमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी विठुरायाकडे महाराष्ट्रातील जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, अशी प्रार्थना केली आहे. “देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र? असा प्रश्न पडतो”, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“जेव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे”, अशी प्रार्थना राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

“आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो”, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us