‘…म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी’, राज ठाकरे यांचा भाजप खासदाराला टोला

राज ठाकरे यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना नाव न घेता चांगलाच टोला लगावला. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केलेला. त्यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

...म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी, राज ठाकरे यांचा भाजप खासदाराला टोला
Chetan Patil | Updated on: Mar 09, 2023 | 9:30 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्यावर्षी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, नंतरच अयोध्येत यावं. नाहीतर त्यांना विरोध केला जाईल, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतलेली. मध्यंतरी बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांनिमित्ताने महाराष्ट्रात येऊन गेले. या दरम्यान मनसे आणि बृजभूषण यांच्यातील वाद मिटला अशी चर्चा रंगलेली. पण मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांचं नाव न घेता त्यांना जबरदस्त टोला लगावला.

“तुमचं हिंदुत्व म्हणजे नुसती जपमाळ असते का? प्रत्यक्ष कृतीतून तर कधी दिसत नाही. मला अयोध्येला बोलावलं, पण विरोध करणारे हिंदुत्त्ववादीच. आतलं राजकारण मला कळलं म्हणून मी गेलो नाही. मग ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं काय झालं पुढे? म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना लगावला. बृजभूषण सिंह यांच्यावर देशाच्या दिग्गज महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरुनही पायउतार व्हावं लागलं आहे. त्याच गोष्टीचा धागा पकडत राज ठाकरेंनी नाव न घेता निशाणा साधला.

राज ठाकरे यांचा भाजपला इशारा

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी भाजपला देखील इशारा दिला. “भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती या गोष्टी होतातच. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान, “या सगळ्या कालखंडात पुढे जात असताना आजच्या परिस्थितीत आमचा राजू पाटील बघा. पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहेत. शोले चित्रपटात बोलत नाही का, एकही है मगर काफी है. संपूर्ण विधानसभा भरली तर यांचं काय होईल? पण हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार केला जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आता जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. इतकं घाण, गलिच्छ राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो हाच आहे का? किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं याची काही मर्यादाच उरलेली नाही. हल्ली बातमी नसतेच, फक्त हा काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला”, असं राज ठाकरे म्हणाले.

“22 तारखेला गुढीपाडव्याची सभा आहे. सायंकाळी ‘शिवतीर्था’वर यावं हे आपल्या सर्वांना आमंत्रण. मला जे काही बोलायचं आहे कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते मी 22 तारखेला काढीन”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. “यांच्या रोजच्या तमाशांना जनता विटलेली आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. महापुरुषांचे पुतळे उभारून काही होत नाही. जयंत्या, पुण्यतिथी या पलीकडे काही हाती लागणार नाही. ते काय करून गेले, बोलून गेले याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us