Sanjay Raut: भाजपचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना संघाचा पैसा, उद्योजकांनी युट्यूबर दत्तक घेतले; राऊतांचा दावा

| Updated on: May 08, 2022 | 4:02 PM

Sanjay Raut: सोशल मीडियाचं महत्त्व सांगताना संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला.

Sanjay Raut: भाजपचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना संघाचा पैसा, उद्योजकांनी युट्यूबर दत्तक घेतले; राऊतांचा दावा
भाजपचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना संघाचा पैसा, उद्योजकांनी युट्यूबर दत्तक घेतले; राऊतांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुंबईसारख्या शहरात सुशातसिंग राजपूत, कंगना राणावत प्रकरण आणि आमच्यावरील आरोप या प्रत्येक प्रकरणात भाजपचा (bjp) सोशल मीडिया काम करत होता. ते शंभरवेळा खोटं बोलतात. लोकांना खरं वाटतं. त्यांच्याशी सामना करायचा असेल तर आपल्याला सोशल मीडियाला एक कार्पोरेट टच द्यावा लागेल. त्यांना कोणी तरी काम नेमून दिलं आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत (sanjay raut) आणि शिवसेना कशी चुकीची आहे याच्यावर तुम्ही बोलायचं. व्हिडीओ तयार करायचे, अशी कामे त्यांनी नेमून दिली आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांना पैसे देतात. त्यांना पैसे कोण देतं? तर संघ परिवार त्यांना पैसे देतो. संघ परिवाराशी संबंधित जे उद्योगपती आहेत. धनिक आहेत. त्यांनी प्रत्येक युट्यूबरला दत्तक घेतलं आहे. ते त्यांना पैसे पुरवत असतात, असं सांगतानाच हे आपण करू शकतो आणि आपण हे करायला पाहिजे. खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे. सैन्य आहे पण वाऱ्यावरची वरात नको, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

सोशल मीडियाचं महत्त्व सांगताना संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. आपण जे बोलतो, ते लिहितो. मोजकंच लिहा. एकही शब्द वाया जाता कामा नये. मोजक्या शब्दात जे मांडायचं ते मांडलं पाहिजे. सोमय्या आणि त्यांचा मुलगा यांना जामीन मिळाला असेल. पण मी एकच वाक्य सांगितलं बापबेटे तुरुंगात जातील. अजून ते चालले आहे. आणि ते तुरुंगात जाणार आहेत. गांधींच्या काळात सोशल मीडिया नव्हता. त्यांनी मूठभर मीठ उचललं संपूर्ण देशाला कळलं. परदेशी कापडाची होळी केली आणि देशभर वणवा पेटला. क्विट इंडिया… एकच शब्द वापरला. काय ताकद होती त्या शब्दात…. तसं करा. शॉट लागतो माहीत आहे ना… 7 नंतर… तसा शॉट लागला पाहिजे. आम्हाला शॉटची गरज नाही. मी तरुणांच्या भाषेत बोलत आहेत. प्रत्येकांने आपलं जीवन जगावं, आपण शिवसेनेचे काही देणं लागतो, आम्हाला जे करायचं ते केलं. यापुढे काही काळ करत राहू. या पुढे हा प्रवास इथपर्यंत आला आहे. तो तुम्ही पुढे न्यायचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ना झुकेंगे ना बिकेंगे…

या देशात सुद्धा पुतीन आहेत. दिल्लीतही पुतीन आहेत. पण शिवसेनाही एक महासत्ता आहे. लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या कार्याला एक चौकट, एक दिशा सक्रियता आणि तरुणांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. हे खूप मोठं काम आहे, असं ते म्हणाले. ही निराश आणि वैफल्य झालेली लोकं आहेत. त्यातून ते आमच्यावर हल्ला करत आहेत. गुन्हे दाखल करत आहेत. आम्ही लढ्यातील सेनापती नाही. शिवसैनिक आहोत. आमचे एकमेव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आहेत. ना झुकेंगे ना बिकेंगे… ही शिवसेना आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चेहऱ्यावर तणाव दिसू देऊ नका

आमच्यावरही अनेक संकटं आले. पण आमच्या चेहऱ्यावर कधी तणाव पाहिला का? आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हा पहिला पराभव आहे. ज्यांना लढायचं त्यांनी त्यांच्या चेहऱ्यांवर चिंता, तणाव दिसू देऊ नये. जो होगा देखा जायेगा. ठाकरेंनी हे शिकवलं. करून करून काय करणार. तुरुंगात टाकणार ना…किती काळ टाकणार. पण जेव्हा आम्ही येऊ तेव्हा अधिक डेंजर होऊन बाहेर येऊ…शिवसेनेशी लढणं तितकं सोपं नाही. महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे म्हणून राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेला आव्हान देणं सोपं नाही. नाही तर एवढ्यात दिल्लीवाले शिवसेनेच्या मानगुटीवर बसले असते. ही ठाकरेंची शिवसेना आहे. वारूळातून मुंग्या बाहेर पडतात तसे शिवसैनिक बाहेर येतात. आपल्याबाबत ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते. त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.