कितीही पत्ते पिसा, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, राऊतांनी ठणकावलं, राज्यपाल सदगृहस्थ, सदाचारी आणि महात्मा

| Updated on: Apr 20, 2020 | 2:02 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप (Sanjay Raut on Maha Governor )असा सामना रंगल्याचं चित्र आहे.

कितीही पत्ते पिसा, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, राऊतांनी ठणकावलं, राज्यपाल सदगृहस्थ, सदाचारी आणि महात्मा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप (Sanjay Raut on Maha Governor )असा सामना रंगल्याचं चित्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडण्याचे पत्ते जे कुणी पिसत असतील त्यांना मी शिवसेनेच्यावतीने इतकंच सांगू इच्छितो की, 27 मेनंतर सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असेल” असं संजय राऊत म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Sanjay Raut on Maha Governor )

याशिवाय संजय राऊत यांनी आपण राज्यपालांकडे बोट दाखवत नाही, राज्यपाल हे सदगृहस्थ आहेत, सदाचारी आहेत आणि ते महात्मा आहेत, असं म्हटलं.

‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’ असे ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदस्यत्वाचा निर्णय अद्यापही होत नसल्याने संजय राऊतांनी हे ट्विट केलं होतं. त्याला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं.

‘राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे… काय होतं ते? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो… हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते.. समजनेवाले को इशारा काफी..’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्ला चढवला.

ही वेळ मतभेदाची नाही : संजय राऊत

“मी काहीही वादग्रस्त ट्विट केलेलं नाही, मी माझं मत व्यक्त केलं. सध्याची परिस्थिती संकटाची, संघर्षाची आहे. अशा वेळी केंद्र विरुद्ध राज्य, राज्य विरुद्ध राज्य, विरोधी विरुद्ध सत्ताधारी, राजभवन विरुद्ध मुख्यमंत्री, हे मतभेद गाडून कोरोनाविरुद्ध एकत्र उभं राहायला हवं”, असं संजय राऊत म्हणाले.

राजभवनाबाबत काल मी जुने संदर्भ वाचत होतो, त्यावेळी राजभवनातील गफलती आढळल्या. त्या भावनेतून मी व्यक्त झालो. मी रामलाल यांच्याबाबत वाचत होतो. त्याकाळात मी हैदराबादला रिपोर्टिंगला गेलो होतो. मला असं वाटतं की या संस्था पवित्र आहेत, अशा संस्थांमधील या बुलंदी तोफा आहेत, यामध्ये कुठेही गडबड होऊ नये. राज्यपालांनी अत्यंत संयमाने, कायद्याने आणि नियमाने वागावं, भले त्यांचे राजकीय विचार काहीही असो, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

महाराष्ट्राचे राज्यपाल सदगृहस्थ आहेत, सदाचारी, अनुभवी आहेत, त्यांना संघाचा प्रचंड अनुभ आहे, संघपरिवारात काम केलं आहे, महात्मा आहेत, त्यांच्यावरती कोणताही आक्षेप घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी त्यासंदर्भात बोलेल, पण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत आणि त्यांना 27 मे पर्यंत एखाद्या सभागृहाचं सदस्य होणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर हे सरकार कोसळेल, किंवा अन्य काही गोष्टी घडतील, पण जे कोणी अशा समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न काही अड्ड्यांवर बसून करत आहेत., त्यापैकी एक अड्डा आपलं राजभवन होऊ नये, असं मी म्हणालो, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

राजभवन हे राजकारणाचा अड्डा नाही. बाहेर बसून कोणी पत्ते पिसत असेल अशाप्रकारे तर मी इतकंच सांगेन, माझ्या पक्षाच्या वतीने, मी सरकार म्हणून बोलणार नाही, शिवसेना पक्ष म्हणून सांगतो, 27 तारखेनंतर या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हेच असतील, तुमचे पत्ते पिसत बसा, डावपेच करत बसा, पण ही वेळ डावपेचाची नाही, ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या 

राज्यपाल हे घटनात्मक पद, दबाव कशाला आणता? शेलारांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष सवाल