मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं…

| Updated on: Apr 24, 2023 | 4:43 PM

2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यातलं सरकार (Maharashtra Govt) येत्या १५ दिवसात बदलणार. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरु झाल्यात असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावरून शिंदे गटाच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावरच पलटवार केलाय. संजय राऊत यांना इथं बसून दिल्लीत काय सुरु आहे हे कसं कळतं? ते काय अंतर्यामी आहेत का, असा सवाल शंभूराज देसाईंनी केलाय. एकिकडे महाविकास आघाडी एकत्र राहिल की नाही, यावरून शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं असताना संजय राऊत हे शिंदे-भाजप युतीवर बोलतायत. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून, अशी स्थिती झाल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली…

संजय राऊत असं का म्हणाले?

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आलाय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पण राऊत यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं, याचं कारण शंभूराज देसाई यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकून राहिल नाही नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. महाविकास आघाडी स्थापन करताना शऱद पवार यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. त्याच पवार साहेबांना आता ही महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक लढेल की नाही, असं वाटत असेल … त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्यानेच त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करायचं म्हणून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचं वक्तव्य केलंय, असं शंभूराज देसाई म्हणालेत.

दोन वेळा विधानसभेत आम्ही 170 प्लसचं बहुमत शाबित करून दाखवलं आहे. अजून वाटत असेल तर विधानसभेत कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून तुम्ही प्रस्ताव आणा. आता असा प्रस्ताव आला तर आम्ही 180-85 च्या पुढे बहुमत दाखवू. शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्रपक्ष एकत्र आहोत. युती भक्कम आहे. भाजपच्या मोठ्या नेतृत्वाने यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. 2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.