शिंदे-भाजप सरकार स्मशानात पोहोचलंय; संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या दबाव असेल म्हणून त्यांनी आपलं विधान बदललं असेल. त्यामुळे त्यांनी आपण काय बोललो होतो हे जाणून घेण्यासाठी आपलं विधान पुन्हा ऐकावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शिंदे-भाजप सरकार स्मशानात पोहोचलंय; संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2023 | 11:02 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा मारला होता, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. राज्यात सरकार आहे का? तेव्हा लकवा मारला होता म्हणता. तुमचं सरकार आता स्मशानात पोहोचलं आहे. काहीच हलत नाही. कान, नाक, डोळे सर्व बंद आहे. लकव्याच्या गोष्टी करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांनी नगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. याच सत्ताधाऱ्यांनी तो पुतळा हटवला होता. त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. म्हणून सरकारला उपरती झाली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाल्या. अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. कुशल प्रशासक होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान न्याय नाकारत आहेत

देशातील कुस्तीपटूंचं अजूनही दिल्लीत आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रश्नावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे. केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा ही देशाची भावना आहे. त्यांना न्याय पंतप्रधान आणि केंद्र सरकार नाकारत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कीर्तिकरांवर दबाव

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत आहे, असं मी म्हणालोच नव्हतो. ते वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे, असा दावा कार्तिकर यांनी केला आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्हाला सापत्नपणाची वागणूक मिळते. विश्वासात घेतलं जात नाही. आम्हाला दर्जा नाही. असं कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. ते आमच्याकडे ज्येष्ठ नेते होते. तिकडे आहे की नाही माहीत नाही. त्यांना ते स्टेट्स आहे की नाही माहीत नाही. त्यांनी घुमजाव केल्याचं ऐकलं. कदाचित त्यांच्यावर दबाव असावा. त्यामुळे त्यांनी घुमजाव केलं असेल. त्यांचं स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावं, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us