‘लोकसभेत काँग्रेसला शून्य जागा द्यायच्या काय?’ संजय राऊत यांचा महत्त्वाचा सवाल

| Updated on: Jun 02, 2023 | 5:35 PM

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात याबाबत अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. पण मविआचे नेते याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. संजय राऊत यांनी आज टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अशीच महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेत काँग्रेसला शून्य जागा द्यायच्या काय? संजय राऊत यांचा महत्त्वाचा सवाल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात या घडामोडी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी राज्यातील महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत आहे. पण जागावाटपावरुन महाविकास आघाडीत खटके उडू शकतात. विशेष म्हणजे जागा वाटपावरुन मविआतील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोरही आल्या आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे. कारण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या 18 जागांवर विजय झाला होता. याबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे? याबाबत चर्चा सुरु आहे.

याच विषयावर खासदार संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “लोकसभा निवडणुकीसाठीचं महाविकास आघाडीचं जे सूत्र ठरेल ते 4 भींती आड ठरेल. ते ठरल्यावर आम्ही तुमच्यासमोर येऊन सांगू. एक तर नक्की की, शिवसेनेचे 19 खासदार होते. त्यापैकी काही सोडून गेले. तरी आमचे महाराष्ट्रात 18 खासदार निवडून आले होते हे नक्की आहे ना?”, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

‘मविआला तडा कसा जाणार?’

“ज्या पक्षाचे 18 खासदार निवडून आले होते तो पक्ष सांगणारच की आमची निवडून आलेली संख्या एवढी होती तेवढ्या जागा आम्ही कायम ठेवू. असं जर आम्ही बोललो तर मविआला कसा तडा जाऊ शकतो?”, असा सवाल त्यांनी केला.

‘काँग्रेसला शून्य जागा द्यायच्या का?’

“आम्ही एकत्र बसून चर्चा करु. काँग्रेसकडे चंद्रपूरची एक जागा होती. पण खासदार बाळू धानोरेकर यांचंही निधन झालं. आता काँग्रेसकडे शून्य जागा आहे. म्हणून त्यांना शून्य जागा द्यायच्या का? जिथे ज्या पक्षाची ताकद आहे तिथे त्या पक्षाला जागा द्यायला पाहिजेत. कारण तिथे ते जिंकू शकतात. काहीही झालं तरी आम्ही एकत्र लढू”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“आम्ही भाजप आणि मिंदे गटाचा पराभव करु. एखाद जागेसाठी मविआत फूट पडेल, या भ्रमात कुणीही राहू नका”, असा इशारा संजय राऊतांनी दिला. तसेच “शिवसेनेला किती जागा हव्यात ते आता मी कशाला सांगू?”, असंही ते यावेळी म्हणाले.