ST Strike | सरकारचा वाढीव पगार रोखण्याचा दम, आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर परतले, इतरांसाठी आजचा मोठा दिवस

| Updated on: Nov 27, 2021 | 9:03 AM

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक अशी पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारने थेट वाढीव पगार रोखण्याचा दम कर्मचाऱ्यांना दिला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कडक भूमिका घेत पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल, असा इशारा दिला आहे. 

ST Strike | सरकारचा वाढीव पगार रोखण्याचा दम, आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर परतले, इतरांसाठी आजचा मोठा दिवस
ST Strike And ANIL PARAB
Follow us on

मुंबई : सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee Strike) ऐतिहासिक अशी पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारने थेट वाढीव पगार रोखण्याचा दम कर्मचाऱ्यांना दिला. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कडक भूमिका घेत पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल, असा इशारा दिला आहे.

संप मिटवण्यासाठी शुक्रवारी अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले. तसंच संप मागे घ्या असं आवाहन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केलं.

अनिल परब काय म्हणाले?

आज महाराष्ट्र सरकार चार पावलं पुढे आलं आणि भरघोस वेतन वाढ दिली आहे. केवळ एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. न्यायालयाच्या समितीच्या हातात आहे. अहवाल आल्यावर त्यावर विचार होईल. त्यांना स्पष्ट सांगितलं. तोपर्यंत एसटी बंद ठेवणं कर्मचारी, सरकार आणि ग्राहकांना परवडणारं नाही. जेव्हा कामकाज सुरू होईल. तेव्हा छोट्यामोठ्या गोष्टींवर चर्चा होईल. पण, आर्थिक भार सोसायचा आणि एसटी बंद ठेवायची असं होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल. पैसे देऊन संप चालू राहणार तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे. असा विचार सरकार करु शकतो. त्यामुळे आम्ही चार पावलं पुढे आलोय. दोन पावलं तुम्ही मागे व्हा, असे आवाहन अनिर परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, समज गैरसमजाबाबतही चर्चा झाली. जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीनं एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो त्यांच्या डोक्यात आहे. सातवा वेतन आयोग द्या आणि करार 10 वर्षाचा करा अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो, असंही ते म्हणाले.

20 हजार कर्मचारी कामावर परतले

सरकारच्या वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 20 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत 3215 कर्मचाऱ्यांना कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. तर 1226 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त करण्यात आली आहे.

कुठल्या विभागात काय परिस्थिती?

मुंबई – एसटी संप अद्यापही सुरु आहे. मात्र, शुक्रवारी 11,549 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटीच्या 315 बस रस्त्यावर आज धावल्या. यात शिवनेरी 47 शिवशाही 105 तर साधी बस 163 बस धावण्याच्या एसटी महामंडळाने सांगितल आहे. यामध्ये 594 बस चालक तर 433 बस वाहक कामावर रुजू झाले आहेत. प्रशासकीय सेवेतील 6,973, कार्यशाळेतील 3,549 कर्मचाऱ्यांनी संपात भाग न घेता कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 11 टक्के कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामावर उपस्थिती लावली.

पुणे – पुण्यातील स्वारगेट आगारात आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. लालपरी अजूनही डेपोतचं उभ्या आहेत. फक्त शिवशाही, शिवनेरी आणि खाजगी गाड्या सुरु आहेत. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. स्वारगेट आगारात कर्मचारी फिरकलेच नाहीत.

सोलापूर – विभागातील 4,200 कर्मचाऱ्यांपैकी दहा एसटी वाहक-चालक कामावर परतले आहेत. काल दहा कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे वैयक्तिक स्तरावर जाहीर करन पाच मार्गावर मार्गस्थ झाले. त्यामुळे मोहोळ, मंद्रूप नळदुर्ग या मार्गावर बस धावली. आजही काही कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर काही मार्गावर बस धावणार आहे. मात्र इतर कर्मचारी संपावर ठाम आहेत.

नांदेड – पगारवाढीच्या घोषणेनंतर दोन दिवसांत केवळ दोन एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. सध्या एसटी कर्मचारी हे नांदेड बसस्थानकाच्या बाहेर भजन आंदोलन करुन लोकांचे लक्ष वेधून घेतायत. जिल्ह्यातील 3209 पैकी एकूण 301 एसटी कर्मचारी कामावर आहेत तर 2908 जण अजूनही कामावर परतलेले नाहीत. तर 63 कर्मचारी हे निलंबित आहेत. आज यापैकी काही जण कामावर येतील अशी अपेक्षा एसटीच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केलीये.

नागपूर – नागपुरातील एसटी कर्मचारी आजही संपावर ठाम आहेत. नागपूर आयोगातून आज सकाळी एकही बस बाहेर पडलेली नाही. एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. त्यामुळे बस स्थानकात आजही शुकशुकाट आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्यास 10 मिनिटात कामावर रुजू होणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. काल 33 रोजनदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

रत्नागिरी – एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये फुट पडली आहे. 203 कर्मचारी कामावरती परतल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. अजूनही चार हजार कर्मचारी संपात आहेत. राजापूर, दापोली, खेड, देवरुख आणि चिपळूण बस स्थानकातून बसेस सुटल्या. 54 एसटी बसमधून 600 हुन अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.

कोल्हापूर – कोल्हापूर विभागातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप तात्पुरता स्थगित केला आहे.
आजपासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. संप स्थगित झाल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा आजपासून सुरळीत होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकात फलाटांवर पुन्हा लाल परी उभी राहिली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विभागातील स्थानक आजपासून पुन्हा गजबजणार आहे.

सांगली – जिल्ह्यात काल 50 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 1 हजार 817 चालक वाहक आणि कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. निलंबित 284 पैकी 130 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सांगलीत काल आणखी 13 एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर गुरुवारी 63 जणांवर कारवाई केली होती. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 76 जणांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात काल एस टी बसच्या 301 फेऱ्यांची नोंद झाली आहे. आजही काही कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला काही कर्मचारी आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत. आज कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा अखेरचा दिवस. हजर न झाल्यास कायदेशीर कारवाई होणार, अशी माहिती आगार मधील अधिकाऱ्याने दिलीये.

अल्टीमेटमनंतर राज्यातील 37 डेपो सुरु

एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यातील एकूण 37 डेपो सुरु झालेत. गुरुवारपर्यंत 24 डेपो सुरु झाले होते. त्यात काल 13 डेपोची भर पडलीये. आज अल्टीमेटम संपलाय त्यामुळे आणखी काही डेपो सुरु होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Anil Parab on ST bus workers strike : सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण संप मागे घ्या; अनिल परब यांची मोठी घोषणा

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्राला वेठीस धरलं, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना