Balasaheb Thorat : राज्यात अनेक प्रश्न, मंत्री मात्र सत्कारात दंग; सरकारच बेकायदेशीर म्हणत बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 17, 2022 | 12:13 PM

ट्विट करणे हेदेखील दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत, संघटित आहोत. संघटित विरोध करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : राज्यात अनेक प्रश्न, मंत्री मात्र सत्कारात दंग; सरकारच बेकायदेशीर म्हणत बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : राज्यात अनेक प्रश्न आहेत. हे सरकार मात्र अजूनही झोललेले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारमधील मंत्री सत्कार घेण्यात दंग आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Assembly session) सुरुवात झाली आहे. सहा दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. मात्र राज्य सरकारला कोणतेही गांभीर्य नाही. अनेक प्रश्न राज्यात सध्या निर्माण झाले असून मंत्री मात्र खातेवाटप आणि सत्कार समारंभात व्यस्त असल्याचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. महाराष्ट्रातील विकासकामांना जे आधीच्या सरकारने निर्णय घेतले होते, त्या निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे. हे सरकार काही करायला तयार नाही, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला आहे.

‘सरकारकडून मुस्कटदाबी’

या सरकारच्या वैधतेबद्दलही थोरात बोलले. ते म्हणाले, हे सरकार करत तर काहीच नाही. खरे तर हे सरकार कायदेशीर आहे की नाही, हा मुद्दा आहेच. जर सरकार असेलच तर शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका घ्यायला हवी. जबाबदारी घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, असे ते म्हणाले. दहशत वापरून हे सरकार चालवण्याचा प्रयत्न आहे, मुस्कटदाबी सरकारकडून केली जात आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही, हे जनतेला समजले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

‘संघटित विरोध करू’

मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट केले. यावरही त्यांनी टीका केली. ट्विट करणे हेदेखील दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत, संघटित आहोत. संघटित विरोध करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच अशा ट्विट्सना आम्ही महत्त्व देत नाहीत. सरकारकडून विरोधकांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला विरोध करतच राहू, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्व विरोधक एकवटले होते. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.