ST Employee Strike | एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस? सरकारचं कामावर हजर रहाण्याचं अल्टीमेटम आज संपणार, कारवाई की तोडगा?

| Updated on: Nov 26, 2021 | 7:28 AM

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee Strike) आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. 'एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार (26 नोव्हेंबर) सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ', असा स्पष्ट इशारा त्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) दिला.

ST Employee Strike | एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस? सरकारचं कामावर हजर रहाण्याचं अल्टीमेटम आज संपणार, कारवाई की तोडगा?
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
Follow us on

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee Strike) आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. ‘एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार (26 नोव्हेंबर) सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ’, असा स्पष्ट इशारा त्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) दिला. तसेच, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

राज्य सरकारने बुधवारी (24 नोव्हेंबर) एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक अशी पगारवाढ जाहीर केली. त्यामुळे आता हे आंदोलन संपुष्टात येईल असं वाटत होत. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणाही केली. मात्र, त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. अनेक एसटी कर्मचारीही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सध्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.

पुढे काय होऊ शकते?

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर-खोतांनी माघार घेतली. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कामागारांचे आंदोलन पुढे सुरुच राहील, असा इशारा दिला आहे. विलीनीकरणाची मागणी त्यांनी लावून धरली आहे. तर सरकारच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. निलंबित कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर यावे. त्यांचे निलंबन रद्द करू, असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही द्विधा मनस्थिती आहे.

पण, एसटी कर्मचारी संप सुरुच ठेवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सोलापूर विभागातील बस सेवा आजही पूर्णपणे ठप्प आहे. वेतनवाढीचा निर्णय झाला असला तरी विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. विलीनीकरण होईपर्यंत संप सुरु ठेवण्यासाठी कालच एसटी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आज एकही कर्मचारी कामावर हजर नाही नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांची आहे.

तर, पुण्यातही एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार न घेण्याची एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे स्वारगेट एसटी स्थानकात शिवनेरीसह खासगी बसमधून प्रवासी वाहतूक सुरु आहे.

अनिल परब काय म्हणाले?

एसटी आंदोलनावर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. खरे तर मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आता कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. आम्ही शुक्रवारी सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी परबांनी दिला. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, तो मान्य करणार – अनिल परब

परिवहन मंत्री परब म्हणाले की, अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, तो मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका, असे आवाहन त्यांनी केली. आंदोलकाचे नेतृत्व सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, माझा संबंध हा कर्मचाऱ्यांशी आहे. त्यांची लिडरशीप कुणी करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. शिवाय मुंबईतून अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पाहून कठोर निर्णय, परिवहन मंत्री परबांचा इशारा; तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला