बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

साधारण प्रत्येक राज्यात इतर राज्यांची भवनं असतात. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं नातं काय आहे हे अजून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलं नाही.

बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटील का जात नाहीत?; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2022 | 3:40 PM

मुंबई: सीमावादाचा मुद्दा घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून आले आहेत. आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. कर्नाटककडून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्र शब्दही काढला नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल केला.

राज्यकर्ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीहून नवस करून आले. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री परत गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही? सर्व मंत्री, आमदारांना घेऊन जा. बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे. तिकडे जाऊन नवसाने सर्व गोष्टी घडत असेल तर नवस करून सर्व गोष्टी पदरात पाडून घेऊ शकतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पण महाराष्ट्राचे प्रश्न राहिले बाजूला. कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडलंय हे सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या घालत आहेत. याच नेभळटपणाविरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या अखेरच्या दिवसात अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार असल्याची घोषणा मी केली होती. त्या घोषणेला या लोकांनी स्थिगिती दिली असेल तर माहीत नाही, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

साधारण प्रत्येक राज्यात इतर राज्यांची भवनं असतात. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं नातं काय आहे हे अजून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलं नाही. महाराष्ट्रात कर्नाटक भवन बांधण्याची मागणी होत आहे. पण त्यांनी तर महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटकात यायला मज्जाव केला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांकडून ब्र शब्दही काढण्यात आलेला नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us