उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा, भाजपवर सडकून टीका
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत वचननाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. "महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतंय. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अचानक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वचननामा जाहीर करत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “महाराष्ट्रात उद्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की, भूताची भीती वाटल्यानंतर, रामाचा जप केल्यानंतर भूतं पळायची, असं म्हणायचे. खरं-खोटं मला माहिती नाही. भाजपची अवस्था आता विचित्र झाली आहे. भाजपला आता पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ते आता रामराम म्हणायला लागले आहेत. त्यांचा हा नेहमीचाच उद्योग आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“सुरुवातीला ठिक होतं. पण 10 वर्ष देशाची सत्ता उपभोगल्यानंतर, मला आजही आठवतं, 2014 मध्ये आम्ही युतीमध्ये होतो, युतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो होतो, तो क्षण माझ्या डोळ्यांसमोर आहे. स्वत: राष्ट्रपती आश्चर्यचकीत होते. कारण बऱ्याच वर्षांनी देशात एका पक्षाची सत्ता आली होती. भाजपने त्यावेळी बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. मग 2019 साली ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी कलम 370 काढलं, आम्ही तेव्हाही सोबत होतो. आता मात्र त्यांची पाशवी इच्छा समोर आली आहे. त्यांना पाशवी बहुमत पाहिजे जेणेकरुन ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशातील लोकशाही मारुन टाकतील. ही त्यांची स्वप्न उघड झाली आहेत”, असा दावा ठाकरेंनी केला.
ठाकरेंकडून वचननाम्याची घोषणा
“काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीरनामा केलाय. मी सुरुवातीलाच जाहीर केलं होतं की, आवश्यक वाटलं तरंच आम्ही आमचा वचननामा प्रसिद्ध करू असं म्हटलं होतं. शिवसेनेच्या वतीने वचननामा प्रसिद्ध करत आहोत”, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. “या वचननाम्याच्या सुरुवातीला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेच्यावतीने जनतेला विनंती करतो की, आशीर्वाद असूद्या. मी वचननाम्यातील ठळक मुद्दे मांडू इच्छितो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्राचं वैभव लुटलं जातंय’
“महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतंय. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत, हिरे व्यापार पळवले, क्रिकेटचा सामना पळवला, फिल्मफेअर कार्यक्रम पळवलं, सर्वच गोष्टी पळवलं जात आहे. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे. ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवू”, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.
“महाराष्ट्राचं वैभव मविआ काळात वाढत होतं, त्यावेळी तेव्हाचं केंद्राचं सरकार मविआ सरकारला मदत करत नव्हतं. आता इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचं वैभव प्राप्त करुन देऊ. आम्ही गुजरातचं काही ओरबाडून घेणार नाहीत. प्रत्येक राज्याला मानसन्मान देऊ. सगळ्या राज्यांना जे आवश्यक असेल ते देऊ. पण वित्तीय केंद्र हे नव्याने महाराष्ट्रात उभारु, जेणेकरुन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ”, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.