
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या राज्यभरातील पदाधिकारी, संपर्कप्रमुख सर्वांना संबोधित केलं. उद्धव ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणाले, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. “लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार तुम्हीच आहात. यांची भाड्याची खेचर महाराष्ट्र अडवणार आणि अडवली? लोक मला सभ्य बोलतात म्हणून माझी पंचायत होते. सकाळी अनिल परब यांच्या वचननाम्याचं लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढी आघाडी कशी मिळाली म्हणून जग हळहळतं. हा मोदींचा पराभव आहे. उत्तर पश्चिम लोकसभेची अमोल कीर्तिकरची जागा शिंदे गटाने ढापली. मोदींचा विजय देखील ढापलाय का? हे लोक विचारतात. चौथी जागा आपण जिंकलो आणि पाचवी देखील जिंकू शकलो असतो. भाजप सहा शून्य असं हरली असती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत पैशांचा धबधबा पडला. आतादेखील पडणार. विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय घडलं हे मी ऐकलं. त्या संदर्भात देखील आम्ही कोर्टात जाऊ. शिक्षक आणि पदवीधरांच्या देखील अनेक समस्या आहेत. अभ्यकरांबद्दल आत्ता अपप्रचार सुरू आहे. पण सचिव कधी निर्णय घेत नाहीत. जो काही अन्याय केला असेल तो तत्कालीन सरकारने केला असेल”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“दहा वर्ष मोदी पंतप्रधान होते. काय केलं? त्यांनी शिक्षकांसाठी काय केलं? पुढचं सरकार हे आमचंच आहे. ऑक्टोबरला निवडणूक लागली की हे पीक तरारून वर आलं पाहिजे. ही सगळी तण काढून फेकावी लागतील आणि नव्याने पीक घ्यावं लागेल. आता चार निवडणुका होत आहेत. मुंबईतील मतदारसंघ मोठा आहे. एका शाखेला फक्त 30 शिक्षक आणि 200-250 पदवीधर आहेत. एक शाखा 50,000 मतदार सांभाळते. 100 टक्के निकाल आपण घेऊ शकतो. या निवडणुकीसाठी मी जाहीर सभा घेऊ शकत नाही. निवडणूक वैयक्तिक संपर्कावर होते. यादी येताच कामाला लागा”, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.
“26 तारखेला निवडणूक आहे. मतदारांना त्यांना कोणती वेळ सोयीचं आहे ते विचारा आणि त्याची नोंद ठेवा. आतापासून घरोघरी जा. सगळ्या नोंदी शाखेत हवी. आपण अनेक वेळा ही निवडणूक जिंकलो आहोत. अपक्ष निवडून येतात. मग संघटना मागे असताना आपण निवडून आलोच पाहिजेत. तुम्ही आमची माणसं फोडलीत. जनतेनं तुमचं कानफाट हे दाखवून द्यायचं आहे. मविआत बिघाडी अशा बातम्या येत होत्या नाना पटोले काही बोलले. परदेशी दौऱ्यासंदर्भात टीका झाली. पण मी उमेदवार जाहीर करून गेलो होतो”, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला.
“कोकणात देखील किशोर जैन यांनी अर्ज भरला होता. पण त्यांनी माझ्या आदेशावर अर्ज मागे घेतला. त्यांचं अभिनंदन. त्याची नोंद मी आयुष्यभर विसरणार नाही. नाशिकमधून आपले उमेदवार गुळवे आहेत. कोकणची जागा आपण काँग्रेसला दिली आहे. आपण त्यांचं देखील काम करायला पाहिजे. कारण त्यांनी देखील आपलं काम केलं. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करायलाच पाहिजे. आता विधानसभेपर्यंत आता कोणाला सुट्टी नाही. मी सुट्टीवर गेलो होतो. त्यासाठी मी हवं तर तुमची माफी मागतो”, असं उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले.