मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच राज्य सरकार केवळ भजे खायचे आणि गुलाबजाम खायचे अशा घात प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला. आरक्षण कुणाला द्यायचं याचे अधिकार आता राज्यांना मिळाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे मेटेंनी मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.
विनायक मेटे म्हणाले, “मोदी सरकारचं मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार. केंद्र सरकारने 2018 रोजी 102 वी घटना दुरूस्ती केली, तेव्हाच हे अधिकार अबाधित होते. अनेकांचा गैरसमज झाला, चुकीचा मेसेज पसरवला. सर्वोच्च न्यायालयानेही टिप्पणी केली. त्याचा मराठा समाजाला फटका बसला. आरक्षण रद्द झालं. आता राज्याला अधिकार मिळाले आहेत. राज्य सरकार आत्ता केंद्राकडे बोट दाखवू शकत नाही. आरक्षण कुणाला द्यायचं याचा सर्वस्वी अधिकार राज्यांना असेल.”
“इंद्रा सहानी केसमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. आरक्षणासाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा वाढली पाहिजे. ही जबाबदारी जशी केंद्राची तशी राज्याचीही आहे. इंद्रा सहानी केसमध्येही ते नमूद आहे. राज्य काही करत नाही, केंद्राकडे दोष देत आहे. ‘आपण भजे खायचे, गुलाबजाम खायचे, ही राज्याची घातक प्रवृत्ती’, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
विनायक मेटे म्हणाले, “राज्य सरकारचे काही मंत्री बोलघेवडेपणाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात जातात. समाजासमोर, टिव्हीवर मोठी भाषणं ठोकतात. अशा सगळ्या घोषणा करतात. मंत्र्यांचा हा बोलघेवडेपणा आहे. अशा मंत्र्यांना केवळ प्रसिद्धी घ्यायची आहे. हे सरकारनधील मंत्री दिशाभूल करत आहेत.”
“आंदोलनाच्या ठिकाणी मंत्र्यांना बोलावलं जातं, ते निर्लज्जपणाने बोलतात, आरक्षणावर मात्र काही होत नाही. जर ठाकरे सरकारने ठरवलं तर आरक्षण मिळेल, अन्यथा मिळणार नाही. 2 दिवसात आम्ही पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी पुढची रणनीती ठरवत निर्णय घेऊ,” असंही विनायक मेटे यांनी सांगितलं.