
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली असून अवघ्या 13 दिवसांनी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी मतमोजणी निकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच याद्या, वाटाघाटी, सीट शेअरिंगला जोर आला. पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अर्ज दिला , तो भरलाही. कागदपत्रांची छाननीही पार पडली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अनेक पक्षांत बंडखोर असून त्यांना थंड करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेते, पदाधिकारी यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सर्वांदरम्यान नागपुरात एक वेगळेच चित्र दिसले. तिथे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता, पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून रडारड नव्हती तर तिथे एका उमेदवाराला बाकीच्या लोकांनी चक्क घरातच बंद करून ठेवल्याचं पहायला मिळालं. तेही त्याने उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून…
वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण हेचं खरं आहे. नागपूरमध्ये अपक्ष उमेदवाराला त्याच्या प्रभागातील लोकांनी त्याच्या राहत्या घरातच बंद केलं , एवढंच नव्हे तर त्याच्या घराला बाहेरून कुलूपही लावलं. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका, आम्हाला तुम्ही हवे आहेत, उमेदवारी मागे घ्यायची नाही असं म्हणत लोकांनी त्यांना बाहेर काढण्यास नकार दिला. बराच काळ हा ड्रामा सुरू असल्याचे पहायला मिळालं.
नेमकं काय घडलं ?
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 13 ड मधील किसन गावडे हे अपक्ष उमेदवार असून त्यांना राहत्या घरात लोकांनी कोंडून ठेवलं. किसान गावडे यांना प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता, पण त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यानंतर किसन गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून भाजपच्या निर्देशानंतर किसन गावडे हे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले होते. मात्र अनेक नागरिकांनी त्यांना थेट विरोध केला आणि त्यांच्या दाराला थेट कुलूप लावत गावडे यांना त्यांच्या घरातच बंद केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या दाराला लॉक लाव्लायवर अनेक समर्थकांनी घराबाहेरच ठिय्या आंदोलनही केलं, तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्याचं दिसून आलं.
काय म्हणाले गावंडे ?
कार्यकर्त्यांच्या भावना उग्र आहेत. 2017 मध्ये जे उमेदवार होते, ते त्याच भागातून दिले होते. पणआता या भागातून 1 तरी उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मी फॉर्म मागे घेण्यासाठी जाणार आहे, पण हे कार्यकर्ते, समर्थक मला जाऊच देत नाहीयेत. मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, असं गावंडे म्हणाले.