अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण

| Updated on: Oct 17, 2022 | 2:55 PM

त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
Follow us on

गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-election) भाजपनं अर्ज मागे घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज नागपुरात ही घोषणा केली. ‘महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लक्षात घेता आम्ही सहानुभूतीने हा अर्ज मागे घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र आम्ही पराभवाच्या भीतीने माघार घेतली नाही. 2024 मध्ये आम्ही नक्की विजयी होऊ, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, रिपाई आणि भाजप यांनी कमळवर निवडणूक लढण्याचं निश्चित केलं होतं. मुरजी पटेल यांनी अंधेरीतून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वानं हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. मुरजी पटेल यांचा अर्ज आम्ही परत घेत आहोत. या निवडणुकीत सौ. लटके या निवडून याव्यात. यासाठी त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरताना 15 हजार लोकांची रॅली काढण्यात आली होती. मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपचा उमेदवार ठरला की, तो भाजपच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही. त्यामुळं मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं.

आमची संपूर्ण तयारी झाली. मतांची जुळवजुळव सुरू होती. आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवात ही निवडणूक जिंकणार होतो. पण, एक वर्षासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. असा निर्णय भाजपनं अनेकवेळा घेतला आहे. एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जाते. ही भाजपची संस्कृती अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून आहे.

त्यामुळं भाजपनं सौ. लटके यांना समर्थन दिलं आहे. पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली.पूर्ण ताकद लावली. पण, राज्याची परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी उमेदवारी मागे घेत आहोत, असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंचं पत्र हा एक भाग आहे. 1980 पासून अनेकवेळा अशा घटना आल्यात. त्यावेळी अशावेळी असा निर्णय घेतला. एखाद्या परिवारातील व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल, तर असा निर्णय घेतला जातो.

सौ. लटके वहिनी यांच्या पतीच्या निधनानंतर त्या ही पोटनिवडणूक लढत आहेत. त्यामुळं हा निर्णय वरिष्ठांनी केला. योग्य पद्धतीनं आमचं नेतृत्व निर्णय घेतो, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.