महाराष्ट्र अंधारात जाण्याची वेळ का आली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 12, 2021 | 11:30 AM

कोळश्याच्या टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. (chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi over Coal shortage in maharashtra)

महाराष्ट्र अंधारात जाण्याची वेळ का आली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट
chandrashekhar bawankule
Follow us on

नागपूर: कोळश्याच्या टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आल्याचा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. 2800 कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्याने महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा न केल्याने ही वेळ आली आहे. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यावे, कर्ज घ्यावं, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.

तर दिल्लीत जाऊन बसलो असतो

आमचं सरकार असतं तर तातडीने 2800 कोटी रुपये दिले असते. दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही वीज कंपनी घाट्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू

महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे, कोळशाअभावी वीजनिर्मितीचे राज्यात 13-13 संच बंद झाले आहेत. ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु झालंय… संपूर्ण राज्य काळोखात जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऊर्जा विभागाने योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आलीय, असं ते म्हणाले.

राज्यातील कोळश्याची स्थिती काय?

दरम्यान, महानिर्मितीने एक प्रसिद्धी पत्रक काढून राज्यातील कोळश्याच्या स्थितीवर प्रकाश टाकला आहे. सद्य:स्थितीत वीज निर्मितीसाठी लागणार कोळसा पुरवठा परिस्थिती सुधारली असून, दररोज 90 हजार ते 1 लक्ष मे. टन कोळशाचा पुरवठा होत आहे. कोळशाचे नियोजन करण्यासाठी महानिर्मितीचे, भुसावळ 210 व 500 मे.वॅ. चंद्रपूर 500 मे.वॅ., पारस 210 मे.वॅ. हे संच बंद ठेवण्यात आले होते. यापैकी कोळसा पुरवठ्यात वाढ झाल्याने भुसावळ 500 मे.वॅ. हा संच सुरु करण्याचे नियोजन आहे.

कोळसा टंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना म्हणून जलविद्युत केंद्रांचा पुर्ण क्षमतेने वापर करण्यात येत आहे. दररोज 1900 मे.वॅ. जलविद्युत निर्मिती करून शिखर मागणी वेळी वीज पुरवठा कायम ठेवण्यात येतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात कोळसा पुरवठ्यावर परिणाम होत असतो. यावर्षी ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा साठा भरपूर कमी झाला. परिणामी सद्याची परिस्थिती उद्भवली आहे. असे असले तरी दररोज होणाऱ्या कोळसा पुरवठ्याची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेता, कोळसा टंचाईची परिस्थिती चिंताजनक निश्चितच नाही. जलविद्युत निर्मिती, वायू विद्युत निर्मिती करून तसेच कोळशाच्या पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून आगामी काळात विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती पुर्णतः सज्ज आहे, असं महानिर्मितीने स्पष्ट केलं आहे.

 

संबंधित बातम्या:

तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत

नवाब मलिक म्हणाले, 100 कोटींच्या दाव्याच्या नोटीसची वाट पाहतोय; कंबोज यांनीही पाठवली नोटीस

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित

(chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi over Coal shortage in maharashtra)