खोटारडी आंदोलनं बंद करावीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा कुणाकडं

| Updated on: Sep 26, 2022 | 3:28 PM

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी.

खोटारडी आंदोलनं बंद करावीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा कुणाकडं
चंद्रशेखर बावनकुळेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे, Tv9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांनी यासाठी सभा घेतल्या. पण, महाविकास आघाडी सरकारनं वेदांतासोबत कुठलाही एमओयू केला नव्हता. त्यांना जागा दिली नव्हती. असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यामुळं आदित्य ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीनं खोटारडी आंदोलनं बंद करावी. अन्यथा त्यांच्या खोटारड्या सभेत जाऊन त्यांना उत्तर देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी. माझ्याकडे सरकारी पत्र आहे. यानंतर खोटे आंदोलनं केलीत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर त्या आंदोलनात आम्हाला घालावं लागेल. सरकारमध्ये असताना तुम्ही झोपा काढल्या. फेसबूक लाईव्ह करत राहिले. प्रकल्प आणला नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

पीएफआयवर बंदी घालावी

पीएफआयवर केंद्र सरकारने कारवाई केलीय. राज्य सरकार कारवाई करत असल्याची माहिती मिळाली. जिथे असेल तिथे झोडपून काढायला हवं.
आरोपींना पकडले पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी पीएफआयच्या संस्था असेल त्यावर बंदी घालावी, नाही तर लोक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

तीन दिवसांत मदतीचे वाटप

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पूर्व विदर्भात 1 हजार 191 कोटी रुपये दिलेत. इतकी मोठी मदत कधीही मिळाली नाही. यामुळे मी शिंदे – फडणवीस सरकारचं धन्यवाद मानतो. ही मदत तीन दिवसांत वाटप होईल.

आज मिहान आणि WCL ची बैठक घेतली. महाविकास आघाडी सरकारचा ॲाटो होता, हे सरकार बुलेट ट्रेन आहे. त्यामुळं झपाट्यानं विकासकामं होतील, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं.