जेलमध्ये विपश्यनेला आल्यासारखं वाटलं, इतका मानसन्मान… तुरुंगातून सुटताच कराळे गुरुजींची प्रहिली प्रतिक्रिया काय?

नितेश कराळे उर्फ कराळे गुरुजींनी तुरुंगातील अनुभव 'विपश्यनेसारखा' असल्याचे सांगितले. अॅट्रोसिटी प्रकरणी अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या कराळे गुरुजींनी, तुरुंगात मोबाईलमुक्त, शांततापूर्ण आणि मानसन्मानाचा अनुभव आल्याचे म्हटले. त्यांच्या मते, अटक बेकायदेशीर असून त्यांच्याविरोधातील गुन्हे खोटे आहेत. त्यांनी राजकीय षडयंत्राचा आरोप करत काही नेत्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला.

जेलमध्ये विपश्यनेला आल्यासारखं वाटलं, इतका मानसन्मान... तुरुंगातून सुटताच कराळे गुरुजींची प्रहिली प्रतिक्रिया काय?
Nitesh Karale
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 10:23 AM

तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं. मोबाईलपासून मुक्त होतो. कॅरम खेळत होतो. टीव्ही पाहत होतो. तुरुंगातील अनुभव अतिशय चांगला होता. काहीच टेन्शन नव्हतं, अशी प्रतिक्रिया नितेश कराळे ऊर्फ कराळे गुरुजींनी दिली आहे. तसेच तुरुंगात आपल्याला मानसन्मान मिळत होता, असा दावाही त्यांनी केला. अॅट्रोसिटीच्या अंतर्गत कराळे गुरुजींना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी तुरुंगातील अनुभवावर भाष्य केलं. तसेच आपल्या विरोधातील गुन्हे खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला.

जेलमध्ये गेल्यानंतर मला वाटलं विपश्यनेला गेलो. हातात मोबाईल नव्हता, चिडचिड नव्हती, शांत वाटत होतं. तिथे आठ दिवस रिलॅक्स वाटलं. जणूकाही विपश्यनेला आलोय असंच वाटत होतं. राईट टाईमला खायला मिळत होतं. सकाळी चहा, नाश्ता येत होता. जेवण येत होतं. त्यानंतर 3 वाजता पुन्हा चहा. 4 वाजता जेवण. कॅरम खेळायला मिळत होतं. टीव्ही पाहायला मिळत होता. पुस्तकं वाचले, असा मस्त अनुभव राहिला. तिथल्या सर्व लोकांनी मला आदर सन्मान दिला. जे लोक तिथं होते ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, त्यांनी मला ओळखलं. मला जेवण सुद्धा घेऊ देत नव्हते. इतका मानसन्मान देत होते, असं नितेश कराळे यांनी सांगितला.

एक मिनिटाचा व्हिडिओ कापून…

इतिहास सांगणं हा गुन्हा आहे का? हा माझा प्रश्न आहे. संदर्भ सांगताना, आरक्षण हटवलं तर कशी परिस्थिती वापस येऊ शकते, हा त्यामागचा उद्देश होता. पण उद्देश न पाहता परस्पर एक मिनिटाचा व्हिडिओ कापून, समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून इथल्या राजकीय लोकांनी राजकारण केलं. पालकमंत्री पंकज भोयर, पृथ्वी शिंदे यांचा मी पोळा फोडणार आहे. पोळा जवळ आला आहे, असा इशारा नितेश कराळे यांनी दिला.

सामान्य माणसाने बोलूच नये काय?

एक ऑडिओ क्लिप आपल्याजवळ आहे ती सोशल मीडियावर टाकणार आहे. त्यामध्ये यांनी सर्रासपणे हेतू पुरस्सरपणे माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचं दिसतं. काही दिवसात मी निर्दोष असल्याचं सिद्ध करून दाखवीन. तसेच या मागे कोण आहेत तेही दाखवेन. वरून दबाव होता. मला पकडायला 25 लोक आले. मी काय एखादा सराईत गुन्हेगार आहे का? एलसीबीचे प्रमुख तिथे उपस्थित होते. अशावेळी सामान्य माणसाने बोलूच नये काय? असा प्रश्न निर्माण होतो, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

माझी अटक बेकायदेशीर

माझी झालेली अटक बेकायदेशीर आहे हे कोर्टाने सांगितलं. मला सीआरपीसी अॅक्ट 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली नाही. एखाद्या फेमस माणसाला, प्रसिद्ध माणसाला रात्री बेरात्री अटक करता येत नाही, अशा सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे. त्यांनी मला रात्री 11.30 वाजता अटक केली, असा आरोपही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us