राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावली महत्त्वाची बैठक, भाजपच्या मदतीसाठी रणनीती आखणार?

| Updated on: Jul 01, 2023 | 11:25 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. यावेळी महत्त्वाची रणनीती आखली जाण्याची चर्चा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावली महत्त्वाची बैठक, भाजपच्या मदतीसाठी रणनीती आखणार?
Follow us on

नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उद्या भाजपसहीत सर्व संलग्नित संघटनांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आरएएसच्या रेशीमबाग स्मृतीभवन येथे उद्या संघाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही विदर्भस्तरीय समन्वय बैठक असल्याची देखील माहिती मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावलेल्या या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विद्यार्थी परिषदेसह सर्व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भाजपकडून विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आरएसएसची ही बैठक आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मानली जात आहे. या बैठकीत पुढील वर्षभराची रणनीती ठरवली जाणार आहे. या निवडणुकीत संघाशी निगडीत सर्व संघटना भाजपच्या मदतीसाठी कार्यक्रम आखणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात लवकरच निवडणुकीचं वातावरण

राज्यात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पावसाळ्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील मोठ्या शहरांमधील महापालिकांची लवकर निवडणूक लागू शकते. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण राज्यातील सध्याची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण येत्या निवडणुकीत भाजपला ठाकरे गटाकडून सत्ता हिसकावून आणायची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण बाजी मारेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणुकांनंतर देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी सर्वात महत्त्वाची आहे. नुकतंच कर्नाटक राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विरोधी पक्षांकडून एकत्रितपणे भाजपचा सामना करण्याचा प्रयत्न

एकीकडे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे देशभरातील विरोधी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली सुरु आहेत. विरोधी पक्षांची नुकतीच पाटणा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दिले होते. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव कसा करावा यासाठी रणनीती आखण्यात आली.