Vidarbha Temperature | विदर्भात उद्यापासून तीन दिवस उष्णतेची लाट; चंद्रपूर, अकोल्याचा पारा 46 अंशांपर्यंत जाणार

कालचं नागपूरचं तापमान 43.7 अंश सेल्सिअस होतं. उद्यापासून ते 44 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यातही 43.7 डिग्री अंश सेल्सिअस तापमान होतं. ते दोन-तीन दिवसांत 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

Vidarbha Temperature | विदर्भात उद्यापासून तीन दिवस उष्णतेची लाट; चंद्रपूर, अकोल्याचा पारा 46 अंशांपर्यंत जाणार
विदर्भात उष्णतेची लाट
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 07, 2022 | 8:03 AM

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात 8 मे ते 10 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला. सध्या विदर्भात असलेल्या तापमानात आणखी वाढ होणार आहे. चंद्रपूर (Chandrapur), वर्धा, अकोला या जिल्ह्यांत तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यात सुद्धा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नागपूर हवामान विभागाचे सहसंचालक एम एल साहू यांनी ही माहिती दिली. वाढत्या तापमानामुळं दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलंय. खूपच महत्त्वाचं काम असेल, तर उष्णतेपासून बचाव (Heat waves) होईल, याची काळजी घ्यावी, असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. नागपूर शहरातील काही सिग्नल दुपारी बारा ते चारच्या दरम्यान बंद राहणार आहेत. याचा अर्थ दुपारी सिग्नलवर प्रवाशांना थांबावं लागणार नाही.

विदर्भातील तापमान वाढणार

कालचं नागपूरचं तापमान 43.7 अंश सेल्सिअस होतं. उद्यापासून ते 44 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यातही 43.7 डिग्री अंश सेल्सिअस तापमान होतं. ते दोन-तीन दिवसांत 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात कालच 45.2 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच होरपळून निघालेल्या विदर्भवासीयांना या वाढत्या तापमानामुळं आणखी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

वॅाटरस्पोर्टकडे कल

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तापमान वाढल्याने जीव कासाविसा होतोय. त्यामुळे दिलासा मिळावा म्हणून दोन वर्षानंतर नागपूरकर सध्या वॅाटरस्पोर्टचा आनंद घेतायत. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने लोकांचा कल सध्या वॅाटरस्पोर्टकडे कल वाढतोय. कोरोनामुळे गेली दोन वर्ष पर्यटन बंद होतं. यंदाच्या उन्हाळ्यात निर्बंध शिथील झाल्याने, नागरिक वॅाटरस्पोर्टचा आनंद घेतायत. त्यामुळे जिल्ह्यातील वॅाटरस्पोर्टसाठी सध्या गर्दी दिसून येतायत.

बुलडाणा जिल्ह्यात 17 उष्माघात कक्ष स्थापन

गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे नागपूरसह विविध ठिकाणी अनेक जण उष्माघाताचे बळी ठरत असल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यात कधी नव्हे ते बुलडाणा जिल्ह्याचा पारा हा 42 अंशाच्यावर गेलाय. त्यामुळे आरोग्य विभागाने उपाययोजना करत, जिल्ह्यात 17 ठिकाणी उष्माघात कक्ष निर्माण केले आहेत. उन्हापासून आपला बचाव करावा आणि काही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या उष्माघात कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.